साताराः रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा मराठी विभाग आणि जिल्हा न्याय विधी प्राधिकरण सातारा यांच्या सहकार्याने मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या निमित्ताने प्रा. डॉ. अनिसा मुजावर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन केलेले होते, या प्रसंगी अध्यक्ष म्हणून सातारा दिवाणी न्यायालयाचे( वरिष्ठ स्तर) न्यायमूर्ती प्रवीण कुंभोजकर बोलत होते. कुंभोजकर म्हणाले की, विद्यार्थी दशा ज्ञानसंचय करण्यासाठी असते. व्यावसायिक संधींचा मृत्यू समोर दिसल्यावरच आपल्याला मार्गदर्शनाची गरज भासू लागते, आपल्याला आपले म्हणणे मांडता आले पाहिजे, स्वबळावर उभे रहाता आले पाहिजे. मातृभाषा आपल्याला हे बळ देत असते. दैनंदिन व्यवहारात जाणीवपूर्वक मातृभाषेचा वापर करा. न्यायालयीन कामकाजात तसेच शासकीय कामकाजात सुद्धा मराठीचा वापर केला जातो, या भाषेच्या दैनंदिन वापरातून तिच्यातील क्लिष्टता निघून जाईल. मराठी भाषा समृद्ध करायची असेल आणि तिचे संवर्धन करायचे असेल तर आपल्या विचार आणि कृती मधूनच मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होऊ शकेल. इंग्रजी हि वैश्विक भाषा असली तरी मातृभाषा म्हणून मराठीचा गौरव आपण आपल्या आचार विचारातून केला पाहिजे, कारण कोणत्याही चांगल्या कृतीची सुरुवात आपल्या विचारातून होत असते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या उपप्राचार्या डॉ. अनिसा मुजावर आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या की, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे, मराठी भाषेतून दैनंदिन व्यवहार पार पाडले पाहिजेत, आपण विनाकारण बाजारात, हॉटेलात किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत गेल्यावर इंग्रजी किंवा हिंदीतून संवाद साधतो. इंग्रजी माध्यमात शिकणारी मराठी पालकांची मुले मराठी बद्दल अनास्था दाखवतात, वास्तविक या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे मराठी शिकवले गेले पाहिजे. अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही पातळीवर मराठीचा सर्वाधिक वापर झाला पाहिजे. इंग्रजी हि ज्ञान भाषा आहे, जगाशी संवाद साधणारी खिडकी आहे, ती आपल्याला यायलाच पाहिजे परंतु आपल्या संस्कृतीची जपणूक जी केवळ आपल्या भाषेद्वारच होते, तिचेही संवर्धन आपण केले पाहिजे.
तत्पूर्वी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील सर्व प्रेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांची असल्याचे प्रा. डॉ. सौ. मानसी लाटकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रामचंद्र पळे व मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. डॉ.सौ. कांचन नलवडे यांनी केले तर, तर प्रा. गजानन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
स्वबळावर चालता येण्यासाठी मातृभाषा आवश्यक आहेः न्या. प्रवीण कुंभोजकर
RELATED ARTICLES