सातारा : आपले सर्वांचे नशिब थोर म्हणून आपण या भारत भूमित जन्माला आलो आहोत. जगाला प्रेरणादायी असलेल्या या भूमिच्या इतिहासाचा सोयिस्कर अर्थ लावणे योग्य नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आबासाहेब वीर यांच्यासह अनेक क्रांतिकारकांनी जे असिम शौर्य गाजवले, त्याग केला, क्रांती केली त्याचा विसर पडत चालला आहे. असे असले तरी या देशाची ताकद इथल्या माणसांमध्ये असून तीच ताकद पुन्हा एकदा उसळी मारुन बाहेर येईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ यांनी व्यक्त केला.
भुईंज, ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार स्विकारल्यानंतर खताळ बोलत होते. पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जाहीर समारंभारत येणार्या पुरस्काराचे वितरण यंदाच्या वर्षी पुरस्कारर्थींच्या निवासस्थानी जावून करण्यात आलेे. त्यामध्ये ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ यांना एक लाख रुपये रोख, शाल, पुष्पहार, श्रीफळ व मानपत्र असे स्वरुप असणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर पेटंट तज्ञ प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे यांना एकावन्न हजार रुपये रोख, शाल, पुष्पहार, श्रीफळ व मानपत्र असे स्वरुप असणारा आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
बी. जे. खताळ यांचे वय 101 असून या वयातही त्यांची श्रवणशक्ती, दृष्टी आणि स्मरणशक्ती उपस्थितांना थक्क करणारी होती. पुरस्काराबद्दल किसन वीर परिवाराला धन्यवाद देत ते म्हणाले, प्रतापराव भोसले हे माझे मित्र. त्यांनी धोम धरणाची उभारणी केली तेव्हा मी पाटबंधारे खात्याचा मंत्री होतो. धोम धरणासोबतच धरणालगतच्या रिंगरोडसाठी प्रतापरावांनी खूप चिकाटी लावली व जबरदस्त पाठपुरावा केला. प्रतापराव हे आमच्यासाठी यशवंतराव चव्हाण आणि आबासाहेब वीरांचे प्रतिनिधी. त्यामुळे त्या रिंगरोडच्या प्रस्तावाला त्यांच्या सांगण्यावरुन मंजुरी दिली. अशा अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी वयाच्या 99 व्या वर्षी लिहलेले माझे शिक्षक हे पुस्तक मदन भोसले यांना भेट दिले. प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे यांनीही त्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पुरस्क़ार प्रदान सोहळ्यानंतर किसन वीर परिवाराचे आभार मानले. ते म्हणाले, आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले मात्र या पुरस्काराचे मोल खूप वेगळे आहे. माझ्या आईच्या उपस्थितीत हा पुरस्कार मला मिळाला असून ही गोष्ट खूप मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुरस्काराची संपूर्ण रक्क़म पूरग्रस्तांना देत असल्याचे जाहीर केले.
मदन भोसले म्हणाले, आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार हा आयुष्यभर व्रती व्रतीने काम करणार्या ज्येष्ठांना दिला जातो. प्रेरणा पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष असून जिद्दीने वाटचाल करणार्या, समाजाला आदर्शवत ठरेल असे काम करणार्या तरुणांना हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगितले. या पुरस्काराची रक्कम किती यापेक्षा हा पुरस्कार आबासाहेब वीर यांच्या नावाने दिला जात आहे हे अधिक मौल्यवान आहे. आबांच्या नावाचे जे मोल आहे तेच या पुरस्काराचे खर्या अर्थाने मोठेपण आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदुकमार निकम, प्रताप यादव, सचिन साळुंखे, मधुकर नलवडे,विजय चव्हाण अरविंद कोरडे, उद्योगपती जितेंद्र धरू, उद्योगपती रवि पाटील, जयवंत साबळे, कारखान्याचे सेक्रेटरी एन.एन. काळोखे, अॅड. सुचित्रा घोगरे काटकर उपस्थित होते.
घरगुती तरीही हृद्य कार्यक्रम –
दोन्ही पुरस्क़ारांचे वितरण दोन्ही पुरस्कारार्थींच्या पुण्यातील निवासस्थानी झाले असले तरी ज्या वातावरणात हा कार्यक्रम झाला तो तेवढाच भारदस्त व हृद्य झाल्याचे दिसून आले.
बी. जे. खताळ यांच्याकडून जुन्या आठवणींना दिलेला उजाळा, सद्यस्थितीवर केलेले भाष्य आणि जीवनाविषयी व्यक्त केलेला दृष्टिकोन भावनारा होता. तर प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे यांना पुरस्क़ार प्रदान करतेवेळी त्यांच्या आईने डोळे पुसत पुसत जेव्हा सांगितले, की गणेशच्या कष्टाचे चीज झाले. जेवतानाही तो एका हातात अन्नाचा घास तर एका हातात पुस्तक असायचं. कितीदा त्याला ओरडले पण त्याने अभ्यास कधी सोडला नाही. स्नेहल दामले यांनी जेव्हा मानपत्राचे वाचन केले तेव्हाही दोन्ही पुरस्कारार्थींच्या कुटुंबियांसह सर्वजणच भारावून गेले.
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार खताळ यांना तर प्रेरणा पुरस्कार प्रा. हिंगमिरे यांना प्रदान
RELATED ARTICLES