सातारा – : सातारा- जावली मतदारसंघातील सातारा तालुक्याचा काही भाग तर, जावली तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम आहे. मतदारसंघात काही ठिकाणी रस्ते करताना वनविभागाची मंजुरी अथवा परवानगी आवश्यक असते. त्यामुळे सातारा- जावली मतदारसंघातील दुर्गम आणि वनआच्छादीत भागातील रस्ते करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग आणि वन विभागाने समन्वय साधून काम करावे, जेणेकरुन त्या- त्या भागातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटेल, अशा सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
सातारा- जावली मतदारसंघात प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडले जात आहे. दरम्यान, अतीदुर्गम आणि डोंगराळ भागात रस्ते करण्याचा सर्व्हे सार्वजनिक बांधकाम विभागाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार करण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, काही ठिकाणी वनविभागाची जमीन असल्याने सदर रस्त्यांसाठी वनविभागाची आणि काही रस्त्यांसाठी जलसंधारण विभागाची परवानगी अथवा मंजूरीची अडचड भासू लागली. या समस्या सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार त्यांच्याच अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभागा आणि वन विभागाच्या अधिकार्यांची संयुक्तीक बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने, सातारा- जावलीचे वनक्षेत्रपाल महेश पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड, जावली बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णात निकम, जिल्हा जलसंधारण अधिकारी रणजीत ओतारी, प्रकल्प विकासचे व्ही.एच. पवार, व्ही.डी. घोरपडे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जावली तालुक्यातील वागदरे- गाळदेव रस्ता, आंबेघर उपराटी मंदीर ते दिवदेव नेमाणेवस्ती रस्ता, आखेगणी – बनवस्ती ते प्रजीमा 68 रस्ता, आलेवाडी खिंड ते रेंगडीमुरा ते कुंभारक्षेी रस्ता, प्रजीमा 68 ते सुर्वेवाडी- राणगेघर ते करंदी रस्ता, कुरुळोशी ते मारणेवस्ती, खिलार मुरा आदी रस्त्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. तसेच सातारा तालुक्यातील पांगारे ते पळसावडे रस्ता, रोहोट ते घाटाईदेवी, खडगांव ते सांडवली, पवनगाव, पवारवाडी आदी रस्त्यांसंदर्भात चर्चा झाली. तसेच डोळेगाव ते शेंद्रे मार्गावरील पुलाचे काम तातडीने पुर्ण करण्याची सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम विभागास केली. डोंगर, दर्यातील, दुर्गम भागातील रस्त्यांची कामे मार्गी लागल्यास सातारा आणि जावली तालुक्यातील दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. हे रस्ते झाल्यास लोकांची वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच पर्यटनवाढीसाठी या रस्त्यांची कामे मार्गी लागणे आवश्यक आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
बांधकाम विभागाकडून तातडीने रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे. यासाठी जलसंधारण आणि वन विभागाने बांधकाम विभागाला सहकार्य करावे. लागेल त्या ठिकाणी परवानगी, मंजुरी देण्याची प्रशासकीय बाब विनाविलंब पुर्ण करावी आणि रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकार्यांना केली. तीनही विभागांच्या अधिकार्यांनी समन्वय साधून तातडीने रस्त्यांची कामे पुर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिली.