सातारा : गेल्या तीन दिवसांपासून जाती-धर्माच्या नावाखाली पसरवलेल्या असंतोषाच्या ठिणग्या सातार्यातही पडल्या होत्या. साता़र्यात तणावपूर्ण शांतता दिसत होती. परंतु अनेकांच्या मनात खदखदही तेवढीच होती. सोशल मीडियाच्याद्वारे पसरवलेल्या जाणा़र्या अफवांमुळे अनेकजण एकमेकांपासून दुरावलेले होते. मात्र, मुळात साताकरांचा स्वभाव हा जातीभेद न मानणारा आहे. परंतु ढवळून निघालेल्या वातावरणामुळे कोणालाच काही समजत नव्हते. ना कोणत्या जातीला, ना कोणत्या धर्माला हाक न देता सर्व सातारकरांच्या माणुसकीला हाक दिली व साता़र्यात सलोख्याची, एकीची वज्रमुठ आवळली गेली व येथे फक्त अन् फक्त माणुसकी जिंकली…!
साता़र्यात सलोख्याची रॅली काढण्याचे आवाहन करताच सर्व सातारकर जातीधर्माच्या, पक्ष संघटनेच्या भिंती तोडून एकत्र आले. सकाळी 11 वाजल्यापासून शाहु चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाजवळ सातारकर जमू लागले. देशभक्तीपर गीतांच्या आवाजाने वातावरण अधिकच पुलक्कीत झाले होते. पहाता – पाहता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली व सर्वानीच हम सब एक है म्हणत सलोख्याची वज्रमूठ आवळली.
रॅलीत सहभागी होणा़र्या सर्वांना गुलाब पुष्प देण्यात आले. तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना ही गुलाबपुष्प देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, लक्ष्मण माने, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, मुस्लिम संघटनेचे नेते सादिकभाई शेख यांनी पुष्पहार अर्पण करुन सलोखा रॅलीस सुरुवात झाली. भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक है च्या घोषणांनी रॅलीचा परिसर दुमदुमून गेला होता. लाल बहादूर शास्त्राी महाविद्यालय, कलावाणिज्य महाविद्यालय, स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, धनंजयराव गाडगिळ महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालयांचे एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अभिवादन करुन मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा गगनभेदी घोषणा देवून साताकरांनी एकीची वज्रमुठ आवळली.
वार विसरला अन् मने जुळली
साता़र्यातील सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, तसेच सर्वसामान्य सातारकर जातीधर्मातील वादविवाद विसरले. एकमेकांच्या गळयात पडून हम सब भाई भाई, असे चित्र दिसत होते. तसेच एकमेकांच्या विरोधात मोर्चा काढणारे आज एकमेकांच्या हातात हात घालून हास्यविनोद करताना दिसत होती. या हास्यविनोदात वाद कधी विसरला अन् मने कधी जुळली ही कोणालाच कळले नाही.