Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीआंबेडकर अनुयायांनी काळाबरोबर बदलावे ः राज असरोंडकर

आंबेडकर अनुयायांनी काळाबरोबर बदलावे ः राज असरोंडकर

सातारा ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सकारात्मक दृष्टी बाळगून काळाबरोबर बदलण्याची गरज आहे, असे मत कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर (मुंबई) यांनी व्यक्त केले.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बौद्धाचार्य ग. सा. कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उजेडाचा आधारसूर्य या पुस्तिकेचे प्रकाशन राज असरोंडकर यांच्या हस्ते अतित येथे करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. विचार मंचावर क्रांतीसिह नाना पाटील कॉलेज वाळवा येथील प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे, संपादक कवयित्री वृषाली विनायक, जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे , चित्रपट निर्माते व अभिनेते समृद्धी जाधव, इस्लामपूर तक्षशिला ज्ञान केंद्राचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्ह्याध्यक्ष व्ही. आर. थोरवडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोल्हापूर विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता संबोधी प्रतिष्ठानचे विश्वस्त रमेश इंजे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज असरोंडकर म्हणाले, ग. सा. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ध्येयवाद अखेरच्या श्वासापर्यंत जोपासला तसेच सातारा जिल्ह्यात विविध संस्था संघटनांचे नेटवर्क उभे करून समाजासमोर आदर्श उभा केला. त्यांचे संस्कार व चारित्र्य संपन्नतेचा उजेड अनुकरणीय आहे. बाबासाहेबांनी दूरदृष्टीने बौद्ध धम्माची दीक्षा समाजाला दिली आहे . बुद्दिप्रामाण्यवादी व वैज्ञानिक दृष्टीकोन मानणार्‍यांनी धम्म स्वीकारला नाही तरी ती व्यक्ती बुद्ध विचाराचीच आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला नाही याबाबत प्रश्चचिन्ह उभे करण्याचा कडवेपणा सोडण्याची गरज आहे. भारत बौद्धमय करीन या घोषणेत सगळ्यांना बौद्ध धम्म देणे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते. संविधानातच बौद्ध तत्त्व मुरललेली आहेत. या संविधानाची बांधीलकी सर्व नागरिकांनी मानावी हेच बाबासाहेबांचे याबाबतचे उद्दिष्ट होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी नागपूर येथे धम्म दीक्षा देते वेळी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आता पाळता येण्यासारख्या असतील तेवढ्याच ठेवण्याची गरज आहे. नकारात्मकतेने समाजाची कधीच प्रगती होत नाही. नकारात्मकतेमुळे येणारी कट्टरता धोकादायक असते. जातीवाद हे जातीवादाला कधीही उत्तर असू शकत नाही. त्यामुळे जाती अस्मिता व कट्टरता याला तिलांजली देण्याची गरज आहे.
या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भन्ते दिपंकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडीयाचे बौद्धाचार्य बी. डी. कांबळे, भागवत भोसले, जे.डी. कांबळे यांनी प्रतिमापूजन व त्रिशरण पंचशील गाथा पठण केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular