केळघर : वार्ताहर – बेवारस रुग्ण असो , महिलेची प्रसूती असो , सर्प दंश असो , अपघात असो वा कोणताही आणीबाणीचा प्रसंग असो लगेच 108 ला फोन करा . लगेच रुग्णवाहिका हजर , हा अनुभव दररोज येतो केळघर परिसरात अविरत आरोग्यसेवा देणार्या 108 या रुग्णवाहिकेचा .आजपर्यंत या रुग्णवाहिकेमुळे जवळपास अडीच हजार रुग्णांना जीवनदान मिळाल्यामुळे ही रुग्णवाहिका या परिसराला वरदान ठरत त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे.
जून 2015 पासून शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने व बीव्हीजीच्या माध्यमातून जावली तालुक्यातील केळघर परिसरात कार्यरत असलेल्या या रुग्णवाहिकेचे डॉ . किशोर फरांदे , डॉ . रविराज निकम , चालक विकास ओंबळे , संतोष मानुकमरे यांचा चांगल्या सेवेबद्दल ग्रामस्थ , भैरवनाथ गणेश मडंळ यांच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला . याप्रसंगी सरपंच रविंद्र सल्लक ,उपसरपंच बजरंग पार्टे , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सौ . साधना कंवारे,युवा उद्योजक राजेन्द्र धनावडे , सचिन पार्टे, जगन्नाथ पार्टे , बाजीराव धनावडे,संदीप बेलोशे , संतोष कासुर्डे ,सागर पार्टे, सागर सल्लक, सतीश शिर्के आदिची प्रमुख उपस्थिती होती .
केळघर व कुसूंबी प्राथमिक आरोग्य केंद्र व मेढा ग्रामीण रुग्णालयातर्गत येणार्या जवळपास 60 ते 70 गावे ,वाडया -वस्त्यावर आरोग्य सेवा देत असताना या रुग्णवाहिकेचे डॉक्टर व चालक यांना तारेवरची कसरत करावी लागते . तरीही न कटांळता डॉ . किशोर फरांदे हे चालक विकास ओंबळे व संतोष मानकुमरे यांना घेऊन दिवसातून तीन -चार कॉल अटेंड करत असतात . तर एक वेळेस सलग नऊ कॉल अटेंड करत रुग्णांना सुरक्षित दवाखान्यापर्यंत पोहचवल्याचे डॉ . फरांदे यांनी सांगितले . तर दुर्गम डोंगर माथ्यावरील वाडी- वस्त्यावरुन गरोदर मातांना रुग्णवाहिकेतून आणत असताना नऊ प्रसूती या सुरक्षितपणे गाडीतच केल्या आहेत . तर ज्या ठिकाणी रुग्णवाहिका जात नाही त्याठिकाणी दोन- तीन किमी पायी चालत जाऊन घरीच गरोदर मातांची प्रसूती केल्यामुळे मातामृत्यू व डोंगरदर्यात शेतात काम करत असताना सर्पदशं झालेल्या रुग्णांना वेळीच आरोग्यसेवा मिळाल्याने सर्पदशांमुळे होणारे मृत्यूप्रमाण जवळपास पूर्ण घटले असल्याचे डॉ . फरांदे यांनी सांगितले .
या परिसरातून सातारा- महाबळेश्वर हा मुख्य मार्ग जात असल्याने या परिसरात वारंवार अपघाताचेही प्रमाण जास्त आहे . अशावेळीही तातडीची सेवा देत अनेक रुग्णांचे प्राण वाचविले आहे . तर अनेक बेवारस पडलेल्या व्यक्तीवर वेळीच उपचार करत त्यांचे प्राण तर वाचविले आहेत .परंतु त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचविण्याचे काम आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणार्या या 108 च्या टीमने केले . गेली अडीच वर्षाच्या सेवेत या 108 रुग्णवाहिकेने विविध प्रकारच्या जवळपास अडीच हजार रुग्णांना तात्काळ सेवा देत त्यांचे प्राण वाचविले आहेत . याकामी बहुताशं वेळा त्यांना तातडीची सेवा देताना, तसेच डोंगरदर्यातून सातारापर्यंत पोहचवताना केळघर प्राथमिक आरोग्य केंद्र व मेढा ग्रामीण रुग्णालयाची वेळोवेळी मदत होत असते . तर यापूर्वी या ठिकाणी डॉ . रुषिकेश दळवी यांनी प्रभावी काम केले आहे . डॉक्टरांच्या प्रभावी कामामुळे व स्थानिक चालकांच्या जलद कृतीमुळे 108 रुग्णवाहिका सर्वपरिचित झाली आहे .
तर महाबळेश्वर व कास या पर्यटनस्थळांच्या मधील परिसर या रुग्णवाहिकेच्या कार्यक्षेत्रात येत आहे . तसेच सर्व परिसर ग्रामीण व डोंगरदर्यांचा असल्याने येथील रुग्णांना रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नाही . यापूर्वी 2005 पासून 102 या रुग्णवाहिकेसह (सूमो गाडी ) चालक संदीप बेलोशे हे सेवा देत होते .
परंतु आता 108 या रुग्णवाहिकेवरील कामाचा ताण वाढला असून याठिकाणच्या ग्रामीण जनतेला अधिक सुविधा मिळण्यासाठी ङद सुविधायुक्त रुग्णवाहिका मिळावी . तसेच रुग्णवाहिकेची वेळेवर यांत्रिक देखभाल दुरुस्ती केलेली असावी . कारण ही रुग्णवाहिका कायम दुर्गम भागात फिरत असते . अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे .