
औंध(वार्ताहर) :- भूत म्हटले की अनामिक भिती वाटणे,
पोटात गोळा येणे असे प्रकार समाजात आपण नेहमीच अनुभवतो..लहान असो वा मोठे असो समाजात नेहमीच भूत हा विषय जिव्हाळयाचा व चर्चेचा बनलेला आहे. कित्येक दशके, पिढया गेल्या ,विज्ञान युग आले तरीही अजूनही भूत म्हटले की अंगावर शहारे येतात पण औंध येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भूताची संकल्पना समूह उच्चाटन करण्यासाठी कुप्रसिद्ध कोडयाच्या माळास भेट देऊन अस्तित्वात नसलेल्या भूतास खर्या अर्थाने गाडून टाकले असून जिल्हयासह राज्यात सध्या या अनोख्या भूत भेटीच्या सहलीचीच चर्चा सुरू आहे.
दरम्यान कोडयाच्या माळावर भूताचा शोध सुरू असताना सुमारे पाचशे मीटर अंतरावर जाणूनबुजून मशाल पेटवून भूताचा अभास निर्माण करणारी अज्ञात व्यक्ती पळून गेल्याने एकच खळबळ उडाली असून सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणार्या अशा प्रवूत्तींंना कठोर शासन होणे गरजेचे बनले आहे.
सोमवती अमावास्येनिमित्त रात्री आठ वाजता येथील स्वामी समर्थ मठातून गणेशवाडी आणि कळंबी गावाच्या हद्दीवर कोड्याचे माळ या ठिकाणी सहलीचे आयोजन केले होते. रात्रीच्या वेळी या ठिकाणी भूताचा वावर असतो अशी भीती पसरवण्यात आली असल्याने अनिसच्या कार्यकर्त्यांनी मुद्दाम हे स्थळ निवडले होते. अमावस्येच्या भीषण अंधारात अनिसच्या कार्यकर्त्यांची कोड्याच्या माळरानावर गजबज सुरू होती. परिवर्तनाची गाणी, तसेच परिसंवाद आदी कार्यक्रम सुरळीतपणे सुरू होते.
कार्यक्रम सुरु असताना अचानक ४०० ते ५०० मीटरच्या अंतरावर पेटती मशाल घेऊन भुते नाचत असल्याचा आभास निर्माण करून जमलेल्या लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीने
केला. मात्र अनिसच्या कार्यकर्त्यांनी भूताच्या मानगुटीवर बसण्यासाठी गडद अंधारात त्या भूतांचा
(अज्ञात व्यक्तीचा)पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या धाडसाने कार्यकर्ते पाठलाग करीत आहेत हे लक्षात येताच भूतांनी मशाल विझवून धुम ठोकली. ती अज्ञात व्यक्ती होती… गावातील युवकांनी , कार्यकर्त्यांनी पाठलाग करून शोधले परंतु झाडाझुुपांचा फायदा घेत ती व्यक्ती पळून गेली…
याप्रकरणी त्या व्यक्तीच्या रानातील छोट्या खोलीची पाहणी युवकांनी केली, तिथे रॉकेलचा वैगेरे वास येत होता, या सर्व प्रकारावरून कोणीतरी जाणूनबुजून भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होते हे उघड आहे, त्या भीती दाखवणाऱ्या व्यक्तीचे नेहमीचेच उद्योग असण्याची दाट शक्यता आहे, तरी त्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर आजपर्यंत ग्रामस्थांमध्ये भीती पसरवल्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा अशी मागणी औंध शाखे मार्फत करणार आहोत अशी माहिती शाखेचे कार्याध्यक्ष तानाजी इंगळे यांनी दिली. त्यानंतर देखील मध्यरात्री दोन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी माळावर तळ ठोकला होता. परंतु पळून गेलेले भूत पुन्हा माघारी आले नाही.
पृथ्वी वरती भूतांचे अस्तित्व प्रत्यक्षात कोठेही नसते, ते माणसाच्या मनात असते, मानवाला येणारी भुताची प्रचिती ही काही वेळा ढोंगची ,मानवाला झालेला इंद्रीयजन्य भ्रम,किंवा भास असतो, आणि काही वेळा स्किझोफ्रेनिया व सायकोसिस या मनोरुग्णतेतून भुताची प्रचिती येते. तसेच भुताने झापटने किंवा अंगात येणे हे प्रगाढ संमोहनाने, मादक पदार्थाच्या सेवनामुळे, फसवेगिरी किंवा खोटेपनामूळे किंवा हिस्टेरिकल डिसोसिएशन किंवा हिस्टेरिकल कॉन्व्हर्जन या मानसिक आजारामुळे येते. अशी माहिती श्रीपाद सुतार यांनी परिसंवादात केले.
यावेळी बाळकृष्ण कुंभार, दत्तात्रय शिंदे, जयवंत खराडे, यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहभोजनानंतर शुभम इनामदार आणि कार्यकर्त्यांनी परिवर्तनाची गाणी सादर करून सहलीची रंगत अधिक वाढवली. रात्री दोन वाजता सर्वानी औंधकडे प्रयाण केले. अनिसच्या औंध शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिक्रिया.. समाजामध्ये भूता खेतांविषयी असणार्या भ्रामक कल्पना दुर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे धाडसी पाऊल उचलले असून यामुळे समाजातील भूताबद्दलचे असणारे गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे. मानसिक आजारातून ,न्युनगंड, भिती यातून भुताबद्दल चुकीचा प्रसार झाला आहे. यापुढे ही समाजातील अशा चुकीच्या संकल्पना समूह उच्चाटनासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
प्रशांत जाधव.. जिल्हा कार्याध्यक्ष अंनिस औंध(सातारा)

