सातारा दि : सातारा जिल्ह्यातील शासकीय भ्रष्ट अधिकारी यांच्याविरोधात अनेकांनी तक्रारी केल्या पण, त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रयत्न काही राज्यकर्ते व वरिष्ठ अधिकारी करीत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला आहे. यावर चाप लावण्याचे काम अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग न्याय मंदिर ठरू लागले आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांचे नाव राज्यभर घेतले जाते ते त्यांचा प्रशासकीय धाक व स्वच्छ चरित्र. सातारा जिल्ह्यातील या सुपुत्रांनी अनेकांनी चांगली शिकवण दिली. त्याचा सातारा जिल्ह्याला नक्कीच फायदा झाला आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक अधिकाऱ्यांनी चांगले काम करून दाखविले आहे. त्याचे उदाहरण दयाचे झाले तर तत्कालीन जिल्हाधिकारी दिनेश अफझलपूरकर, अरुण भाटिया ते रामस्वामी आणि पोलीस अधिक्षक अशोक कामटे, सुरेश खोपडे ते संदिप पाटील अशी भली मोठी यादी आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात सहा महिन्यात अठरा लाच खोर प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पैशाची मागणी होत असल्याचे मान्य करून वैदकीय क्षेत्रातील ऑडिओ संभाषण सर्वत्र गाजू लागले आहे. मूळ मुद्दा हा आहे की,सुशिक्षित व कायद्याचे संपूर्ण ज्ञान असलेल्या या वैदकीय अधिकाऱ्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार का केली नाही? याचा खुलासा करणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यातील या विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के व त्यांच्या टीम ने यशस्वीपणे कारवाई करून लाचखोरांना चाप लावला आहे. त्यामुळे भ्रष्ट कामांची लक्तरे निघाली असली तरी मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यास खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात स्वछता मोहीम राबविण्यात आली असे होणार आहे.
भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे.शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल. अशी खात्री जिल्ह्याला पटू लागली आहे.समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. त्यासाठी टोल फ्री नंबर १०६४ व व्हाट्सउप नंबर ९९३०९९७७०७ यांच्याशी संपर्क साधावा. कारण, सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभाग हाच सातारा जिल्ह्यात हुकमी भ्रष्टाचार निर्मुलन प्रतिबंधक बाण ठरू लागला आहे. याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.