सातारा : मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कर्नाटक होऊन मुंबई करता चाललेली महिंद्रा कंपनीची फोर व्हीलर क्रमांक (घ 25 चउ 4359) ही काशीळ गांधीनगर याठिकाणी हायवेवर चालकाचा ताबा सुटल्याने झाडावर आदळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चालक आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी आहे. काशीळ गावाजवळील ही दुर्घटना आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, एक मुलगा (अंदाजे साडेतीन वर्ष)आणि पाच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन सौदागर असं कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव आहे. तसंच हे सर्वजण कर्नाटकातील धारवाडचे रहिवासी होते. हा अपघात बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे.
निजामुद्दीन अब्दुलनबी सौदागर (वय 69), सफुरा निजामुद्दीन सौदागर (वय 58), मन्सुब निजामुद्दीन सौदागर (वय 40), नाफिया मन्सुब सौदागर (वय 35), तैयबा मन्सुब सौदागर (वय 6), आकसा मन्सुब सौदागर (वय 4 वर्षे), अहमदरजा मन्सुब सौदागर (वय 2 वर्षे, सर्व रा. मदिहाळ डेअरी भंडारी गल्लीरोड, धारवाड, राज्य कर्नाटक) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात चालक शहाबाज इस्माईल भंडारी (वय 30) हा गंभीर जखमी झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निजामुद्दीन सौदागर आणि सफुरा सौदागर हे दाम्पत्य हज यात्रेला जाणार होते. त्यांना सोडण्यासाठी मुलगा मन्सुब आणि सून नाफिया हे आपल्या तीन चिमुकल्यांसह मुंबईला निघाले होते. कर्नाटकातून हे सर्वजण कारने (के 25 एमसी 4359) कोल्हापूरमार्गे मुंबईला निघाले होते. शहाबाज भंडारी हा कार चालवत होता.कर्हाडजवळ त्यांनी जेवण केल्यानंतर हे सर्वजण पुढील प्रवासाठी निघाले. सातारा तालुक्यातील काशीळ गावाजवळ आल्यानंतर चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे भरधाव असलेली कार महामार्गाकडेला असलेल्या गुलमोहरच्या झाडावर जोरदार आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, सहाजण जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.कारमध्ये अडकलेल्या तैयबा सौदागर आणि चालक शहाबाज भंडारी याला कसेबसे बाहेर काढले. त्यानंतर दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तैयबा सौदागरचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात संपूर्ण सौदागर कुटुंबच मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कर्नाटकातील धारवाडमध्ये सौदागर कुटुंबीयांचा फूल विक्रीचा व्यवसाय होता. हज यात्रेला जाण्यापूर्वीच या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काशीळजवळ भीषण अपघात,एकाच कुटुंबातील 7 जण ठार
RELATED ARTICLES