सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून लावंघर खोर्यातील गावांना उरमोडी धरणाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरु होता. दरम्यान, उघड्या पाटाने पाणी नेण्याऐवजी आता बंदीस्त पाईपलाईन टाकून पाणी नेण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे 25 टक्के पाण्याची बचत होणार असून हे पाणी त्याच तालुक्यात सिंचनासाठी वापरता येणार असल्याने हे पाणी लावंघर खोर्यातील गावांना शेतीच्या सिंचनासाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवडाभरात बंदीस्त पाईपलाईनसाठी स्वर्हे सुरु केला जाणार असून लावंघर खोर्यासाठी वरदान ठरणारी ही योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
लावंघर उपसा सिंचन योजनेसंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक झाली. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्या सौ. कमल जाधव, पंचायत समिती सदस्या सौ. विद्या देवरे, पाटबंधारे विभागाचे (उरमोडी) कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड यांच्यासह संबंधीत अधिकारी आणि लावंघर, शिंदेघर, सायळी, चिकणेवाडी, करंजे तर्फ परळी, सावंतवाडी, शिंदेघर, काळोशी, मस्करवाडी, कुरुण, आंबवडे बु. आणि परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठक सुरु होतानाच उपस्थित ग्रामस्थांनी आमच्या शेतीला पाणी मिळणार का? असा सवाल करुन ही योजना झाली पाहिजे. आम्ही या योजनेची चातकाप्रमाणे वाट पहात आहोत, असे सांगून योजना लवकर मार्गी लावावी तसेच आमच्या शेतीला पाणी मिळावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली. उरमोडी धरणातून सातारा तालुक्यात बंदीस्त पाईपलाईनने पाणी जाणार असल्याने 25 टक्के पाणी बचत होणार आहे. शासनाच्या धोरणानुसार त्या 25 टक्के पाण्याचा उपयोग लावंघर खोर्यातील गावांना सिंचनासाठी करावा यासाठी राजू भोसले, विद्यमान सदस्या आणि मी स्वत: पाठपुरावा करत आहे. कृष्णा खोरे महामंडळाकडे पत्रव्यवहार करुन लावंघर उपसा सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक निर्णय झाला आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून सर्व्हे करण्यात येणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितले.
योजनेबाबत माहिती देताना कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी येत्या आठवडाभरात सर्व्हेचे काम सुरु करणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या ठिकाणी पाणी हवे आहे तेथे चेंबरची सुविधा केली जाणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सर्व्हे करताना प्रत्येक गावातील दोन प्रतिनिधी सोबत घ्या. त्यांच्या म्हणण्यानुसार बंदीस्त पाईपलाईन कोणत्या जागेतून टाकायची याचा निर्णय घ्या. अनेक ठिकाणी गाव खाली आणि जमीन वर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त क्षेत्रास कसा होईल याचा विचार करुन बंदीस्त पाईपलाईन टाका, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकार्यांना केल्या. बंदीस्त पाईपलाईनमुळे कॅनॉलसाठी जमीन वाया जाणार नाही. सर्व्हेसाठी अधिकार्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करावे. ही योजना लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी मी पाठपुरावा करणार असून लवकरच ही योजना मार्गी लावू, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ग्रामस्थांना दिला.
यावेळी अशोक अडागळे, मधूकर शिंदे, महेंद्र शिंदे, दादा शिंदे, बाजार समितीचे संचालक नानासो गुरव, राजेंद्र पवार, तानाजी देवरे, शशिकांत झगडे, अनिल लोहार, कृष्णा धनवे, बबन यादव, सोपान मुसळे, भिकू यादव, सुरेश सावंत, अरुण शिंदे, विक्रम शिंदे, यशवंत निकम, दिनकर पवार, नाना शिंदे, राजेंद्र यादव, विष्णू चिकणे, विठोबा चिकणे, रमेश पवार, अंकुश शिंदे, आबा शिंदे, शंकर पवार, अशोक लाड, लक्ष्मण देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.