कराड: मलकापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या द्वेषापोटी आणि स्वत:च्या स्वार्थासाठी एक माजी मुख्यमंत्री, एक माजी आमदार यांच्यासह तालुक्यातले अनेक पुढारी एकत्र आले. पण मलकापूरच्या जनतेने मात्र भाजपाच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले. निवडून आलेले सत्ताधारी आणि आपल्या मतांमध्ये केवळ 1.76 टक्क्यांचाच फरक राहिला असून, काही किरकोळ गोष्टींमुळे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला असला, तरी मलकापूरच्या जनतेने भाजपाच्या उमेदवारांना भरघोस साथ देऊन भाजपाचा नैतिक विजय साध्य केला आहे, असे प्रतिपादन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी केले. मलकापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता व नागरिकांचे आभार मानण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर शेतीमित्र अशोकराव थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, नूतन नगरसेवक दिनेश रैनाक, नूरजहाँ मुल्ला, भास्कर सोळवंडे, अजित थोरात, निर्मला काशीद, माजी नगराध्यक्ष आबा गावडे, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, कृष्णा बँकेचे संचालक महादेव पवार, पैलवान आनंदराव मोहिते आदी मान्यवर होते.
मलकापूरच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यरत असणार्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि भाजपाला भरभरून मतदान करणार्या जनतेचे आभार व्यक्त करून ना. डॉ. अतुल भोसले म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराने आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आपण या निवडणुकीत अटीतटीची लढत दिली. मात्र अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना निसटता पराभव पत्करावा लागला. पण कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता, तो पचवून लगेच त्यावर मात करण्यासाठी आपले पक्षसंघटन अधिक मजबूत करावे. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहावे. मलकापूरच्या नगरपरिषदेत भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून गेलेले 5 नगरसेवक नेहमी मलकापूरच्या विकासासाठी बांधिल राहतील. तसेच जनतेच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडून, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहोरात्र कष्ट करतील, अशी ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.
अशोकराव थोरात म्हणाले, की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येत्या काळात योग्य पक्षबांधणी करून येणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहावे. मलकापूरच्या निवडणुकीत जवळपास निम्म्या मतदारांनी भाजपाच्या पाठीशी राहत भक्कम पाठबळ दिले असून, आपण सर्वांनी केलेल्या कामाचे हे फलित आहे. आपण या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेचे प्रश्न लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला असून, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे, नूतन नगरसेवक भास्कर सोळवंडे, अजित थोरात, सुहास कदम, चंद्रकांत देसाई, ईसाक मुजावर यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी मनोज येडगे, उमा प्रमोद शिंदे, अवंती घाडगे, शोभा यादव, अश्विनी संतोष हिंगसे, शामराव शिंदे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मलकापूरात नैतिक विजय भाजपचाच: ना.डॉ.अतुल भोसले
RELATED ARTICLES