पाटण :- पाटण विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन महिन्यात प्रशासन व सर्वांनीच योग्य त्या खबरदारया घेतल्याने अपवाद वगळता कोरोनाचे रूग्ण सापडले नव्हते. परंतु दरम्यानच्या काळातील शिथीलता व कोरोना संदर्भातील कमी झालेली भिती व गांभीर्य यामुळे पुन्हा येथे कोरोना आपलं डोक वर काढायला लागला आहे. याला वेळीच आवर घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रशासन त्यांच्यापरीने काम करेलच पण त्यांना सहकार्य करताना यापुढे केवळ त्यांच्यावरच अवलंबून न रहाता प्रत्येकानेच आपल्यासह आपल्या गावाची काळजी घेताना कडक उपाययोजना राबवाव्यात. आपणच आपले व समाजाचे रक्षक बनून कोरोनाचा कहर होण्यापुर्वीच आटोक्यात आणण्यासाठी स्वयंस्फुर्तीनेच पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.
या पत्रकात सत्यजितसिंह पाटणकर यांनी पुढे म्हटले आहे की गेल्या दोन महिन्यांत आपल्या मतदारसंघात कोरोनाचा आटकाव करण्यात आपण सर्वजण व प्रशासनही यशस्वी झाले होते. काही अपवाद वगळता कोरोनाची म्हणावीशी झळ आपल्याला बसली नव्हती. परंतु या दिर्घ काळानंतर निश्चितच याबाबतची भिती व गांभीर्य कमी झाले त्याचवेळी शासन निर्णयातील शिथीलता यामुळेही पर जिल्हा, राज्यातून येथे मोठय़ा प्रमाणावर नवीन शहरी भागातील लोक आले. यापैकी काहीनी याबाबतची अधिकृत माहिती दिली तर काहींनी ती लपवली यातूनच आता आपल्या अगदी जवळपासच्या भागातही कोरोना बाधीत रूग्ण सापडायला सुरूवात झाली आहे. निश्चितच आपल्यासाठी ही धोक्याची घंटा वाजली आहे याचा तितक्याच गांभीर्याने विचार करा. लाॅकडाउन, शिथीलता याबाबत शासन आवश्यक ते निर्णय घेईल, नियम, निर्बंध लावेल पण आता आपणही आपल्या स्वतःसह समाज व गावात काही नियम व निर्बंध लावून घेणे महत्वाचे आहे. यासाठी प्रशासनाने व आरोग्य विभागाने घालून दिलेल्या निर्बंध, नियम याचे काटेकोरपणे पालन करताना आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. शहरी भागातून येणाऱ्यांची माहीती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे याबाबत कोणी काही लपवत असेल तर त्याबाबतची सावधानता बाळगावी व माहीती द्यावी. कोरोना हा रोग वेळेत योग्य इलाज झाल्यानंतर बरा होतो त्यामुळे त्याविषयी विनाकारण वेगळी भिती बाळगण्याचे काहीच कारण नाही. याउलट जर त्यासंदर्भातील काही लक्षणे आढळून आल्यास तातडीने त्या व्यक्तीला जवळच्या रूग्णालयात नेवून त्याची तपासणी करावी. जेणेकरून तो व्यक्ती तर बरा होईलच याशिवाय त्याचे कुटुंबीय व नातेवाईक, समाज यांचाही संभाव्य धोका कमी होईल याबाबत जागरूकता बाळगा. परगावाहून आल्याबाबत व आरोग्यविषयी लक्षणे लपविणे हे सगळ्यांसाठीच घातक आहे याशिवाय त्यानंतर निर्माण होणारी धोकादायक परिस्थिती याचाही गांभीर्याने विचार करा.
आपल्याकडे कोरोना रूग्न सापडल्यानंतर आपण खडबडून जागे झालो आहोत पण हीच काळजी व खबरदारी ही केवळ एक, दोन दिवस न घेता जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आता याबाबत गावागावातील तरुणांनी पुढाकार घेऊन याबाबतची जनजागृती करावी. आपले वार्ड , गावाच्या वेशीवर पहारा देताना प्रशासकीय नियमांचे पालन करावे. गावात नव्याने येणारया व जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवावे. आजारी रूग्ण किंवा संशयीत व्यक्ती याबाबत तात्काळ संबंधित यंत्रणाना जागृत करावे. कोरोना विषयी अनाठायी भिती बाळगून तो लपविण्याचा विचार करता कामा नये त्याचवेळी बेफिकीरपणे आपले व कुटुंबीय व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणेही योग्य नाही. त्यामुळे आता या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करा आणि ‘ आपणच आपले रक्षक ‘ बनून प्रशासनाला सहकार्य करत या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी संघटीत व्हा असेही आवाहन शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले आहे.