सातारा : जावली तालुक्यातील केंजळ येथे गेल्या काही दिवसांपासून सातबारा वरील नोंदीचा फायदा घेवून रोडवेज सोल्युशनने शासनाची दिशाभूल करुन खाणकाम सुरु केले आहे. कंपनीने येथील वनराई, पर्यावरण संपवण्याचा कटच रचला आहे. त्यामुळे हा खाणपट्टा रद्द करण्यात यावा, अशी मागणी केंजळ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केंजळ परिसरातील सुमारे शंभर शेतकरी व ग्रामस्थ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांची भेट घेतली. त्यांनी आपली व्यथा मांडली. यानंतर त्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, रोडवेज सोल्युशन केंजळ ग्रामपंचायतीकडे खाणकामाचा परवाना मागितल्यानंतर त्यास नकार देण्यात आला. असे असतानाही शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून नियमांचे उल्लंघन केले आहे. ही जिल्हाधिकार्यांचीही दिशाभूल आहे. मेढा पोलीस ठाणे आणि जावली तहसीलदार यांना सांगूनही त्याची दखल घेतलेली नाही. येथील खाणकाम थांबवावे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु, असा इशाराही केंजळ ग्रामस्थांनी दिला आहे.सध्या लोकसभेचे मतदान झाले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करून मतदारांची चेष्टा करू लागले आहेत.
रोडवेज सोल्युशन कंपनीने केंजळ येथील डोंगरातील वनराई नष्ट करण्याचा सपाटा सुरु केला आहे. शासनाचा आदेश हा इतर जमिनीचा आहे पण, दुसरीकडे खाणीचे काम सुरु आहे.त्यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून स्थानिकांच्या आरोग्याचाही विषय निर्माण झाला आहे. येथे मोर, लांडोर, भेकर, ससा, माकड, अन्य रानटी प्राण्यांचा वावर असून वनसंपदाही मोठ्या प्रमाणात आहेत. खाणकामामुळे आता त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दोन पोकलेन, एक जेसीबी लावून येथे खाणकाम सुरु आहे. कृषी विभागाने येथे पाणलोटचे काम केले आहे. तेही काम नष्ट करण्याचा प्रकार सुरु आहे. केंजळ गाव कण्हेर पुनर्वसित आहे. या लगतच बागायती जमीन आहे. असे असतानाही रोडवेज सोल्युशनला खाणकामाचा कसा परवाना दिला?याचा जिल्हा प्रशासन खुलासा करीत नाही. अशी खंत व्यक्त केली जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
या निवेदनावर सदाशिव केंजळे, केशव केंजळे, जगन्नाथ पाटील-केंजळे, अमोल केंजळे, गणेश केंजळे, दत्तात्रय केंजळे, सदाशिव कुंभार, विपूल केंजळे, सुरज केंजळे, सुरेश केंजळे, महादेव केंजळे, बापू केंजळे, मंगेश पवार, आनंदराव केंजळे दशरथ केंजळे, बबन केंजळे, दशरथ केंजळे, राघू केंजळे, गोरख केंजळे, संपत सणस, विठ्ठल केंजळे, सुधीर केंजळे, श्रीकांत केंजळे, बाळासाहेब केंजळे यांच्या सह्या आहेत.
बेकायदा खाणीच्या विरोधात केंजळसह सहा गावातील ग्रामस्थ आक्रमक
RELATED ARTICLES