साताराः समाजातील ज्येष्ठ नागरिकांना जगण्याचे बळ भक्तीमुळे मिळते. प्रत्येक धर्मातच विविध गुरू आहेत. भारतीय धर्मसाधनेत गुरूला महत्वाचे स्थान आहे. देव ही संकल्पना मनातून कोणालाच नष्ट करता आली नाही. या ईश्वरी संकल्पनेनेच माणसाला जगण्याचे सामर्थ्य मिळते. भक्तीची गरज ही तुमचे मानसिक ताण कमी करण्यासाठीच आहे व त्याला पर्याय नाही.म्हणूनच जगात आनंद मिळविण्यासाठी भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही असे उदगार प्राचार्य पुरूषोत्तम शेठ यांनी काढले.
येथील ज्येष्ठ कवी शशीकांत पाठक यांच्या भक्तीची पाऊले अमृताची, देशभक्ती माझी शान, आकाशफुल व पूर्वदिशा या 3 कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा नगरवाचनालयातील पाठक हॉल येथे संपन्न झाला यावेळी प्राचार्य शेठ यांनी वरील उदगार काढले. कार्यक्रमासाठी दैनिक ग्रामोध्दार चे संपादक बापूसाहेब जाधव अध्यक्ष स्थानी होते.याप्रसंगी नगरवाचनालयाचे विश्वस्त आणि ज्येष्ठ कवी डॉ.सुरेश गायकवाड,श्रीपाद कुलकर्णी व स्वत: ज्येष्ठ कवी शशीकांत पाठक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन आणि सरस्वती देवीचे प्रतिमेचे पुजन झाल्यावर कवी शशीकांत पाठक यांच्या वतीने प्रास्ताविक करताना अशोक पंचवाघ म्हणाले की, 1959 पासून लेखन सुरू केले. मराठी साहित्य संमेलनातही अनेक कविता सादर करण्याचा बहुमान मिळाला. अनेक दैनिकात लेख व कवितांच्या प्रकाशनानंतर जून 2001 मध्ये दोन पुस्तकांचे प्रकाशन केले. आध्यात्मिक बैठकीमुळे मिळालेल्या दृष्टातातून आध्यात्मिक लेखन, निसर्ग पर्यटन, विविध संत व देवांवर लेखन करण्याची संधी प्राप्त झाली.
श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
प्रारंभी शशिकांत पाठक यांनी सर्व मान्यवराचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून केला.
प्राचार्य डॉ. सुरेश गायकवाड आपल्या मनोगतात म्हटले की, शशिकांत पाठक यांनी स्वतःच्या अतिशय अभ्यासपूर्ण विवेचनानंतर अवलोकन करून ही काव्ये रचली. कविता ही जीवनाची समीक्षा असते. कोणीही काव्याला निकष लावू शकत नाही. या कवितासंग्रहाची मांाडणी व शैली वेगळी असून पाठक यांच्या मनात साचून राहिलेली भावना या प्रकाशनात प्रकट झाली आहे. कवितेचा मुख्य प्राण हा विचार असून त्यातील भाव प्रांजळ आहे. अशा या 145 कवितांच्या सादरीकरणाबद्दल मी पाठक यांचे विशेष अभिनंदन करतो
अध्यक्षीय भाषणात दै. ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव म्हणाले की, शरीराने साथ न देताही शशिकांत पाठक यांच्या वैचारिक धडाडीमुळे हे लेखन आपणा सर्वापर्यत पोहचत आहे. मनाच्या जिद्दीला शरीर साथ देत नसतानाही त्यांची ध्येयासक्ती या उपक्रमातून दिसत आहे. घरातील मंडळींनी दिलेल्या सहकार्याने पाठक यांच्या या कृतीला मोलाची साथ मिळाली. त्यांनी असेच लिहित रहावे अशा मी शुभेच्छा देतो.
अशोक पंचवाघ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास सौ.रोहिणी पाठक, श्रीमती शैलजा चरेगावंकर, सुभाष देशमुख, गौतम भोसले, आनंदा ननावरे, सौ.मंगल पाठक, दिलीप चरेगावकर, श्री खटावकर, रविराज पाठक, श्रीमती भोसेकर यांचेसह जिल्हयातील कवी,्र कवयित्री व पाठक कुटूंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.
जगात आनंद मिळविण्यासाठी भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाहीः प्रा.शेठ
RELATED ARTICLES