पाटण:- मुख्यमंत्र्यां सोबत बैठकीचे पत्र आंदोलन स्थळी प्रधान सचिवांनी पाठवून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मिटिंग घेण्याचे लेखी निर्देश दिले आहेत. त्यामुळे आज निघणारा लाँगमार्च स्थगित करत आहोत पण आंदोलन सुरूच राहील. परंतु प्रत्यक्ष मिटींगच्या तारखेचे पत्र मिळून मिटींग झाल्याशिवाय आंदोलन थांबनार नाही. हा श्रमिक मुक्ती दलाचा इतिहास आहे. असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी आंदोलन स्थळी व्यक्त केला.
कोयनानगर ता पाटण येथे कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलन स्थळी आज निघणा-या लाँगमार्च निमित्ताने प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन
करताना ते बोलत होते, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या अंमलबजावणी बाबत मुख्यमंत्र्यांशी बैठक लावावी अन्यथा २ मार्चला मंत्रालयावर लाँगमार्च काढू असा इशारा डॉ भारत पाटणकर यांनी प्रशासनाला दिला होता. त्यानुसार आज कोयनानगर येथुन लाँगमार्चला सुरवात होणार होती. त्या पार्श्वभूमीवर आज पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी आंदोलन स्थळी भेट देवून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भुषण गगराणी यांच्या सहीचे लेखी पत्र डॉ भारत पाटणकर यांना दिले. या पत्राचे हजारो प्रकल्पग्रस्तांच्या समोर वाचन करण्यात आले.
या पत्रात म्हटले आहे की आपल्या संघटनेमार्फत सात जिल्ह्यांमध्ये विकास सर्वांचा विकास या धोरणा साठी आंदोलन सुरू केले आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी आपल्या मागण्या वर बैठक लावण्याकरिता मार्च मधील तिसऱ्या आठवड्यात वेळ देण्याचे निर्देश दिले आहेत. तशी तारीख, वेळ, ठिकाण स्वतंत्रपणे कळविण्यात येईल या पार्श्वभूमीवर आपण आपले आंदोलन मागे घ्यावे. अशी विनंती पत्रात केली आहे.
दरम्यान डाॅ पाटणकर यावेळी पुढे बोलताना म्हणाले की यावेळच्या आंदोलनाचा विषय वेगळा होता. ज्या कामासाठी आम्ही चालत निघणार होतो ते काम झाले आहे. आम्ही चाललो असतो तर सरकारची नाचक्की झाली असती. आताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे पत्र मिळाल्याने लॉंग मार्च थांबवत आहे. पण आंदोलन चालूच राहील. बैठक झाल्याशिवाय आम्ही माघार घेत नाही. हा श्रमिक मुक्ती दलाचा इतिहास आहे. आम्ही भिक मागत नाही. समन्यायी विकास, सर्वांचा विकास या साठी आमचा लढा सुरू आहे. आम्ही विजय घेऊनच माघारी येणार. व याच आंदोलन स्थळी विजयाची सभा घेणार.
समन्यायी विकासाचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला असून याची अंमल बजावणी कशी करता येईल. याचा आराखडा शासनाने तयार करावा. आणि अन्यथा प्रकल्प ग्रस्त आंदोलन स्थळावरून उठणार नाहीत. तसेच ही बैठक श्रमिक मुक्ती दलाबरोबरच होईल. असे जाहिर करुन तसा ठराव हात वर करून घेण्यात आला. यावेळी श्रमुदचे मोहन अनपट, डी के बोडके,चैतन्य दळवी,मारुती पाटील,दिलीप पाटील,रणजित जगताप,मालोजीराव पाटणकर,संजय लाड,महेश शेलार,यांच्यासह सांगली,सातारा, सोलापूर,रत्नागीरी, ठाणे,येथील हजारो प्रकल्प ग्रस्त कोयनानगर येथे लॉंग मार्च साठी उपस्तीत होते.
दरम्यान आज निघणा-या लाँगमार्चच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासाठी जिल्हा राखीव पोलिस दल, पाटण, फलटण ,कराड,सातारा, कोरेगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, याच्यासह सुमारे १४५ पोलीस कर्मचारी फौजफाट्याने तैनात असल्याने कोयनानगर ला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
– लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांत लागत असुन आचारसंहिता लागली तरी बैडकीत निर्णय घेऊ शकतो, पण ते जाहीर करता येणार नाहीत असे डाॅ पाटणकर यांनी यावेळी सांगितले.