सातारा : परळी भागात गेल्या आठ- दहा दिवसांपासून मोबाईल, दूरध्वनी आणि इंटरनेटसेवा बंद पडली होती. या भागात फक्त बीएसएनएल कंपनीचे टॉवर असून इतर कोणत्याही कंपनीची रेंज येत नाही. मात्र बीएसएनएलचे दोन्ही टॉवर बंद पडल्याने मोबाईल आणि इंटरनेट सेवा कोलमडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. याची माहिती मिळताच आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बीएसएनएलच्या अधिकार्यांची झाडाझडती घेतली आणि टॉवर पुन्हा सुरु झाले. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा पुर्ववत झाली आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परळी भागातील मोबाईल, इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा पुर्णपणे बंद झाल्याने परळी भागातील लोकांची फार मोठी गैरसोय सुरु होती. याबाबत परळी भागातील काही ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे तक्रार करुन मोबाईल सेवा सुरु करण्याची मागणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्काळ पोवई नाका येथील बीएसएनएलच्या कार्यालयात जावून वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेतली. कार्यालयात बीएसएनएलचे महाप्रबंधक राजेश कुमार, उपमहाप्रबंधक बी. आर. माने, सहायक प्रबंधक सुर्यवंशी, मंडल अभियंता अनुप सिंग यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले उपस्थित होते. परळी भागात सज्जनगड आणि ठोसेघर याठिकाणी बीएसएनएलचे टॉवर आहेत. हे दोन्ही टॉवर बंद पडल्याने या संपुर्ण भागातील दूरध्वनी, मोबाईल आणि इंटरनेट सुविधा बंद पडली आहे. परळी भाग हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. त्यामुळे याठिकाणी मोबाईल सुविधा ही अत्यावश्यक बाब आहे. मात्र ही सुविधा बंद पडल्याने या भागातील लोकांना त्यांचे पै पाहुणे, परगावी असलेली मुले अथवा नातेवाईकांशी संपर्क होत नाही. तसेच एखादी दुर्घटना अथवा आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास मोबाईल बंद असल्याने मोठी हानी होवू शकते. बीएसएनएल ही शासकीय कंपनी आहे. लोकांच्या सेवेसाठी ही कंपनी निर्माण करण्यात आली आहे. असे असताना तुम्ही टॉवर दहा- दहा दिवस बंद कसे ठेवता? असा सवाल करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. ऑनलाईन प्रणाली मुळे टॉवरची बीले भरण्यास विलंब होतो. त्यामुळे कधीकधी टॉवर बंद पडण्याचे प्रकार होतात, असे अधिकार्यांनी सांगितले. मात्र परळी भागात जनसंपर्काचे मोबाईल हेच साधन आहे. बीएसएनएल शिवाय याठिकाणी कोणतेही नेटवर्क चालत नाही. त्यामुळे लोकांची गैरसोय होवू नये, याची काळजी घ्यावी आणि तातडीने टॉवर चालू करुन मोबाईल सेवा पुर्ववत सुरु करावी, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या आक्रमकतेमुळे बीएसएनएल कंपनीने त्वरीत दोन्ही मोबाईल टॉवर सुुरु केले. त्यामुळे परळी भागातील मोबाईल, इंटरनेट सेवा पुन्हा सुरु झाली. याबद्दल परळी भागातील ग्रामस्थांनी आ, शिवेंद्रसिंहराजे यांना धन्यवाद दिले.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या आक्रमकतेमुळे बीएसएनएलचे टॉवर पुन्हा सुरु
RELATED ARTICLES