वडूज : एनकूळ (ता. खटाव) या गावात सद्या तीव्र चाराटंचाई जाणवत आहे. या ठिकाणी चारा छावणी देण्यासंदर्भात प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.
खटाव तालुक्याच्या पूर्व भागात पशुपालनाचा व्यवसाय करणारे एनकूळ हे प्रमुख गांव आहे. या गावात अंदाजे लहान-मोठी दीड ते दोन हजार जनावरे आहेत. दुष्काळी परस्थितीमुळे परिसरात तीव्र चाराटंचाई जाणवू लागली आहे. टंचाईचा अंदाज आल्याने गावातील प्रमुख कार्यकत्यांनी 15 फेब्रुवारी 2019 रोजी महसूल विभागाकडे चारा छावणी मागणीचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर योग्य ती कागदपत्रे पडताळणी, कृषी व पशुसंवर्धन विभागाचा अहवाल आदी तांत्रिक बाबी आल्या. कृषी विभागाने 18 एप्रिलपर्यंत गावातील चारा पुरेल असा अहवाल दिला होता. सदरची तारीख उलटून 15 दिवसाचा कालावधी झाला. तरी अद्याप छावणी सुरु करण्याचे आदेश देण्यासंदर्भात टाळाटाळ होत आहे.
गावातील केवळ एकाच संस्थेने छावणीची मागणी केली आहे. त्यामध्ये स्थानिक कसलीही अडचण नसताना प्रशासनाच्या लालफिती कारभारामुळे छावणी सुरु करणे रखडले आहे. येत्या चार दिवसात छावणीसंदर्भात निर्णय न झाल्यास गाई-गुरांसह तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
छावणीच्या मागणीसंदर्भात एनकूळकर आंदोलनाच्या पावित्र्यात
RELATED ARTICLES