सातारा : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर मतदार याद्याचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यानुसार 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत ज्या मतदारांना 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्या पात्र मतदारास मतदार नोंदणी करता येणार आहे. मतदारानी आपल्या नावाची नोंदणी मोठ्या प्रमाणात करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल बोलत होत्या. या पत्रकार परिषदेस सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी 1 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 असा असणार आहे. 30 नोव्हेंबर 2018पूर्वी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे. डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादी छपाई 3 जानेवारी 2019 पूर्वी व अंतिम मतदार यादी ही 4 जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ज्या पात्र मतदार मतदारांची नावे अद्याप मतदार यादीमध्ये समाविष्ट केली गेलेली नाहीत, अशा मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी मतदार केंद्र अथवा ुुु.र्पींीि.ळप या संकेतस्थळावर अर्ज करावा. जे मतदार कामासाठी परदेशी गेले असतील ते मतदार नमुना नं.6 अ भरुन नाव नोंदणी करता येईल. मयत, दुबार स्थलांतरीत मतदार वगळणीसाठी अथवा आक्षेप घेण्यासाठी नमुना नं.7 अर्ज मतदान मदत केंद्र अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. ज्या मतदाराची नाव नोंदणी झालेली आहे परंतु नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मतदार मदत केंद्र अथवा ुुु.र्पींीि.ळप या संकेतस्थळावर अर्ज करावा. जे मतदार त्याच मतदार संघात दुसर्या ठिकाणी स्थलांतर केले असेल तर नमुना 8 अ अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज व हरकती सादर करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील 8 मतदार संघामध्ये एकूण 11 मतदार मदत केंद्रावर तहसील कार्यालयामध्ये स्वीकारले जातील अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे स्वीकारले जातील. नागरिकांना आता आपल्या घर बसल्या देखील ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी.
सातारा जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यामध्ये मतदान प्रक्रियेविषयी जनजागृती होण्यासाठी 236 साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच शालाबाह्य तरुणांमध्ये मतदान प्रक्रिये विषयी जनजागृतीसाठी 44 चुनाव पाठशालांचीही स्थापना करण्यात आलेली आहे. मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील, दिव्यांग, समाजातील वंचित घटक, पात्र महिला व तृतीय पंथी मतदारांच्या नोंदणीवर विशेष भर दिला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.