पाटण :- केविड – १९ संदर्भात पाटण तालुक्यात नागरीकांच्या बरोबर प्रशासकीय यंत्रणेने आज पर्यंत चांगले काम केले आहे. जनजागृती व मार्गदर्शक प्रयत्नाने बाधित कोरोना साखळी खंडित होत आहेत. असेच सहकार्य नागरिकांनी पुढील काळात देखील प्रशासनाला करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पाटण येथे पत्रकारांशी बोलताना केले.
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह आज पाटण दौऱ्यावर आले असता ते तहसिल कार्यालय पाटण येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समिर यादव, पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, डॉ. चंद्रकांत यादव, पाटण नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदी. प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले मुंबई – पुणे सारख्या शहरातून सातारा जिल्ह्यात येणारांची संख्ये पैकी सर्वाधिक संख्या पाटण तालुक्यातील आहे. आतापर्यंत कोरोना बाधित सापडल्यापैकी सर्वांच्याच कोरोना साखळ्या खंडित करण्यात यश येत आहे. पाटण तालुक्यातील नागरिकांनी याबाबतीत प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. असेच सहकार्य पुढील काळात देखील राहवे. असे आवाहन करताना महसूल व आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी अधिकारांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार येत आहे. रिक्त असलेल्या जागा येत्या एक – दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने भरून काढल्या जातील असे त्यांनी सांगितले.
२०१९ च्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त झालेल्या अनेक शेतकरी, व्यापारी, रहिवासी नागरिक यांना अद्याप मदत मिळालेली नाही. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले नुकसानभरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकरी, व्यापारी, रहिवासी नागरिक यांची माहिती प्रामुख्याने मागवून घेऊन त्यांना तातडीने नुकसान भरपाईची देण्यात येईल. त्यासाठी आज मी येथील संबधितांना सांगत आहे. असे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या वार्तालाप नंतर जिल्हाधिकारी यांनी पाटण येथील कोरोना विलगीकरण कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर ते कोयनेला रवाना झाले.