सातारा दि. 17(जिमाका) : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी असताना लाभार्थ्यांना रेशन धान्य मिळण्याबाबत असलेल्या तक्रारी यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर व तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही भरारी पथके तक्रारी प्राप्त झालेल्या दुकाने, संवेदनशील दुकाने यांना भेटी देवून तपासणी करीत आहेत.तसेच तक्रारींचे निराकरण करीत आहेत. गेल्या 5 दिवसात 190 स्वस्त धान्य दुकान तपासणी करण्यात आली असून, 17 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जादा दराने धान्य विकणे व विहीत परिमाणापेक्षा कमी धान्य देणे या कारणास्तव 3 स्वस्त धान्य दुकाने रद्द करणेत आली असून 1 दुकान निलंबित करणेत आले आहे तसेच 2 तक्रारींवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.
सातारा जिल्हयामध्ये एकूण 11 तालुक्यामध्ये 1681 स्वस्त धान्य दुकाने आहेत चालू महिन्याचे म्हणजे एप्रिल 2020 मध्ये 5460 मे.टन गहू व 3398 मे.टन.तांदूळ नियमित धान्य वाटप झाले असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य कुटूंब लाभार्थी व अंत्योदय योजनेतील प्रती लाभार्थी 5 कि.मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे. केशरी रेशनकार्ड धारकांना माहे मे पासून प्रति सदस्य 3 कि.गहू रु.8/- प्रमाणे व 2 कि. तांदूळ रु.12/-प्रमाणे वाटप केला जाणार आहे.