नवी दिल्लीः मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी मसापच्यावतीने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. गुरुवारी आंदोलनकर्ते दिल्लीत दाखल झाले. परंतु पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. राजघाटावर प्रार्थना करण्यासाठीसुध्दा आंदोलकांना जाऊन दिले नाही. त्यामुळे आंदोलकांनी महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर शिवघोष करत जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सदबुध्दी द्यावी अशी प्रार्थना करुन अभिनव पध्दतीने उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. राज्यभरातून आलेले मराठी भाषिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्र सरकारने 27 फेब्रुवारीपूर्वी मराठी भाषेला अभिजातचा दर्जा द्यावा अन्यथा त्यानंतर राज्यात व्यापक आंदोलन करण्यात येईल असे जाहीर केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा या मागणीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक दिनी सातारा, पुणेसह राज्यभरातून मोठया संख्येने मराठी भाषिक आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झाले होते. पोलिसांची आंदोलनाबाबत चर्चा झाली परंतु त्यांनी आंदोलन करण्यास परवानगी नाकारली तसे लेखी पत्रही दिले. आंदोलकांनी राजघाटावरील महात्मा गांधीजीच्या समाधीस्थळी आणि महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळ अशा दोन ठिकाणी केंद्र सरकारला सद्बुध्दी द्यावी अशी प्रार्थना करुन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी राजघाटावरही जाण्यास मनाई केली. त्यानंतर महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर अभिनव पध्दतीने प्रार्थना आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणा मंत्र म्हणून वातावरण दणाणून टाकण्यात आले. जय भवानी, जय शिवाजींच्या जोरदार घोषणा देत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे अशी मागणी मराठी भाषिकांनी केली.
प्रार्थना झाल्यानंतर उपस्थित मराठी भाषिकांसमोर बोलताना आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, गेली चार वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मद्रास उच्च न्यायालयातील याचिका निकाली निघाली आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने केंद्रसरकारने अजूनही निर्णय घेतला नाही. महाराष्ट्रातील अनेक नेते केंद्रीय मंत्रीमंडळात आहेत त्यांनी इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर मराठी भाषिक नाराज होतील. मराठीला 27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनादिवशी अथवा त्यापूर्वी अभिजात दर्जा दिल्याची घोषणा सरकारने करावी. आम्ही आतापर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन केले आहे त्याची दखल केंद्र सरकारने घ्यावी अन्यथा 27 फेब्रुवारीनंतर व्यापाक आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली दोन वर्षे केंद्र सरकारकडे प्रयत्न करत आहोत. परंतु केंद्र सरकारकडे राजकीय उदासीनता आहे. केंद्र सरकार कोणतीही भूमिका घेत नाही. मराठीबाबतच अशी उदासीनता का आम्हाला पडलेला प्रश्न आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर द्यावा. आम्ही दिल्लीपर्यंत येऊन आंदोलन करत आहोत हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पावले टाकावीत, अशी आमची मागणी आहे.
मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी म्हणाले, मसाप आणि मराठी भाषिकांनी मराठीला अभिजात दर्जा द्यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले आहे. लवकरात लवकर केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही तर तीव्र आंदोलन करुच परंतु वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्याचा विचार करण्यासही मागेपुढे पाहणार नाही. राज्यातील सर्व मराठी भाषिक आंदोलनात सहभागी झाले त्याबद्दल आभारी आहोत यापुढेही सर्वांनी असाच पाठिंबा द्यावा.
आंदोलनात आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, मसाप पिंपरी चिंचवड प्रतिनिधी राजन लाखे, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, डॉ. उमेश करंबळेकर, कवीवर्य बा.सी.मर्ढेकर समिती सदस्य हरिष पाटणे, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, नविआ पक्षप्रतोद अमोल मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, फिरोज पठाण, उद्योजक संतोष यादव, अॅड. चंद्रकांत बेबले, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, राजू गोरे, जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश बाचल, श्रीकृष्ण जोशी, वजीर नदाफ, सतीश घोरपडे, अमर बेंद्रे आणि त्यांचे कुटुंबिय, सोमनाथ पवार, राजेंद्र जगताप, वैभव पवार, विशाल कदम, सचिन सावंत, अक्षय जाधव, ओंकार भंडारी, अजित गुरव, सातारा, पुणेसह राज्यभरातून आलेले मराठी भाषिक सहभागी झाले होते.
मराठी भाषिकांचा दिल्लीत घुमला आवाज, शिवघोष करत मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी
RELATED ARTICLES