वाई: मिनी कोकण समजला जाणारा वाईचा पश्चिम भाग हा जैव विविधतेने नटलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. या भागात रायरेश्वर, कमळगड, केंजळगड, यांच्यासह सह्याद्रीच्या उतुंग रांगानी नटलेला आहे. पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेले धोम व बलकवडी धरण याच भागात आहेत. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने धोम-बलकवडी धरणांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे. परंतु धोम व बलकवडी धरणात पाणीच नसल्याने या ठिकाणी येणार्या पर्यटकांचा हिरमोड होत असल्याचे दुर्दैवी चित्र पहावयास मिळत आहे, तरीही बलकवडी धरणावरील पाण्याचा शॉवर पर्यटकांना भुरळ घालतोय, या भागात पर्यटन वाढीसाठी अमर्याद संधी असताना प्रशासनाची मात्र डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. धोम परिसरात पर्यटकांना थांबवून ठेवण्यासाठी कोणत्याही हायफाय सोई-सुविधा नसल्याने पर्यटक थोडा थांबून परतीच्या मार्गाने निघून जातात. याचा फटका या परिसरातील उद्योगांना बसत आहे, या भागातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालत असतो. त्यामुळेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून विविध भाषिक चित्रपट निर्माते या निसर्गरम्य परिसराच्या प्रेमात आहेत.
विविध हिंदी चित्रपट मोठ्या बॅनरचे या भागातच पूर्ण झालेले आहेत. परंतु मधल्या काळात वाई तालुक्यातील काही भुरट्या संघटनांनी गुंडा गर्दी करून खंडणीसारखे गलिच्छ प्रकार केल्याने वाईचा पश्चिम भाग बदनाम झाला. त्याचा फटका शुटींग व्यवसायाला बसला आहे. या परिसरात पर्यटकही मोठ्या प्रमाणात देवसेंदिवस वाढत चालले आहेत.उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने महाबळेश्वरला येणारे पर्यटक वाईच्या महागणपतीसह पश्चिम भागातील धोम-बलकवडी धरणाला पहिली भेट देतात.त्यामुळे महाबळेश्वर बरोबरच धोम-बलकवडी धरणावर फिरायला येणार्या पर्यटकांची मुरकंड पडलेली असते.शासनाच्या वतीने पर्यटन वाढीसाठी विमानाचे धोम धरणाच्या पाण्यात यशस्वी लँडीग करण्यात आले होते. तसेच बलकवडी धरणावरील पाण्याचा शॉवर पर्यटकांना आकर्षित करील असाच आहे, ही सेवा सुरु करण्यात पर्यटन खात्याकडून कानाडोळा झाल्याने या भागातील लोकांची संधी हातची गेली आहे. तालुक्यातील एजंटांनी या भागीतील बळीराजाला अल्पभूधारक बनविले आहे. हि या भागाची शोकांतिका आहे. धोम धरणावर असणारे बोट क्लब खाजगी मालकीच्या असल्याने त्यांना त्या ठिकाणी सुधारणा करताना मर्यादा पडतात. वाईच्या पश्चिम भागात धोम धरणावर येणार्या पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. परंतु त्यामानाने या ठिकाणी सोयी-सुविधा नाहीत. पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही.
प्रत्येक विभागाने पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केल्यास त्यानुषंगाने रोजगार निर्मितीसाठीचे पोषक वातावरण निर्माण होवू शकते. संपूर्ण वर्षभरात दिवाळीची सुट्टी, ख्रिसमस, उन्हाळ्याची सुट्टी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव व इतर सुट्टीच्या दिवशी संपूर्ण देशातून फिरायला येणार्यांची संख्या कमी नाही. खाण्या-पिण्याचे छोटे-मोठे स्टॉल्स नाहीत, उशीर झाल्यास लॉजची व्यवस्था नाही. अशा एक नव्हे अनेक उणीवा याठिकाणी पहावयास मिळतात. त्यामुळे या ठिकाणी येणारा पर्यटक थांबण्याचे नावच घेत नाही, त्यातच दुष्काळाच्या झळा या भागात सुध्दा बसत असल्याने धोम धरणात पर्यटकांना पाण्यातून रपेट मारण्यासाठी पाणीच शिल्लक नाही. त्याचे योग्य नियोजन झाल्यास संपूर्ण वर्षभर या परिसरात तरुणांच्या हाताला काम निश्चित मिळेल,या परिसरातील युवकांच्या हातला काम मिळेल व शहराकडे धावणारा युवक याच ठिकाणी स्थिर होण्यासाठी प्रयत्न करेल. परतीच्या पावसासारखा पर्यटक या भागात फिरावयास येतो परंतु या भागातील उणिवांमुळे त्वरित परत निघून जातो.धोम पाटबंधारे विभागाने स्वतः बोटिंग क्लब चालू केल्यास अनेकांना स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होवू शकतो. या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. तोही ठेका स्थानिकांना नाही. प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास वाईचा पश्चिम भाग एक पर्यटन स्थळ नक्कीच नावारूपास येईल.
धोम-बलकवडी धरणात पाणीच नसल्याने पर्यटकांचा होतोय हिरमोड
RELATED ARTICLES