वडूज : एका बाजूला लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी व प्रशासन निवडणूकीच्या कामात कार्यमग्न आहे. तर दुसर्या बाजूला माढा मतदारसंघाच्या शेवटच्या टोकाला असणार्या खटाव तालुक्यातील पेडगांव या गावातील महिला व नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी अहोरात्र भटकंती करावी लागत आहे. ऐन सुगिच्या दिवसात दिवसभर राबून हंडाभर पाण्यासाठी रात्री-अपरात्री रांग लावावी लागत आहे.
याबाबतची माहिती अशी, वडूज या तालुक्याच्या गावापासून सुमारे 5 कि.मी. अंतरावर पेडगांव हे सुमारे 2हजार 500 लोकसंख्येचे गांव आहे. मुख्य गावासह सुभाषनगर, जांभळीचा मळा, कुशाबानगर, चव्हाणवस्ती, बावदरा, जगदाळे वस्ती, डोणे वस्ती, बौध्द व मातंग वस्ती अश्या सात ते आठ वस्त्या आहेत. गावामध्ये सुमारे दीड हजाराच्या आसपास पशुधनही आहे. या गावात चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. टंचाई परिस्थिती लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व जागृत कार्यकत्यांनी तातडीने टँकर मागणीचा प्रस्ताव पाठवला. मात्र लाल फितीच्या दफ्तर दिरंगाईमुळे टँंकर मंजूरीस महिनाभराचा कालावधी लागला. सध्या गावात 12 हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या तीन खेपा होत आहेत. हे पाणी सार्वजनिक विहीर व पाण्याच्या टाकीत ओतले जाते. त्यामुळे चार दिवसातून एकदा सार्वजनिक नळाला पाणी येते. तर एका जागेवर सार्वजनिक टाकीतून मोठ्या प्रमाणात पाणी सुटत असल्याने रात्री, अपरात्री महिला, मुली व वृध्द लोकांना पाण्यासाठी रांग लावावी लागत आहे. एका बाजूला शेतात दिवसभर काबाडकष्ट करायचे. व दुसर्या बाजूला पाण्यासाठी रात्र रात्र रांग लावायची. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणीखेपा वाढवून प्रतिदिन 68 हजार लिटर पाणी द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून त्यावर कारवाई नाही.
अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार
स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांचा कालावधी होवूनसुध्दा रस्ते, पाणी आदी मुलभूत सुविधा पुरेश्याप्रमाणात मिळत नाहीत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. येत्या चार दिवसात वाढीव टँकर खेपाची मागणी पुर्ण केली नाही तर ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकील असा इशारा युवा कार्यकर्ते गणेश जगदाळे व सचिन निकम यांनी दिला आहे.
दिवसभर सुगीचे काम …अनं संध्याकाळी पाण्यासाठी रांग
RELATED ARTICLES

