Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण

राज्य घटनेची सामाजिक न्याय व बंधुत्व ही तत्वे रुजविण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले
सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय व बंधूत्व ही तत्वे रुजवली आहेत. त्या तत्वाची जोपासणा करणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण आज श्री. बडोले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, नगरसेवक धनंजय जांबळे, विजय काटवटे, अशोक गायकवाड, अनिल देसाई, विठ्ठल बलसेटवार, बबनराव कांबळे, अण्णा वायदंडे आदी यावेळी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्रात जिथे जिथे वास्तव्य होते, अशा स्थळांचा विकास शासनामार्फत करण्यात येत असल्याचे सांगून श्री. बडोले पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन तेथे वास्तव्यास असणारे घर शासनाने घेतले आहे. तसेच इंदू मिल येथे उभारण्यात येणार्‍या स्मारकाचे कामही सुरु झाले आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फुटांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्ता संपूर्ण देशभर संविधान दिन साजरा करण्यात आला. सध्या अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जगातील नामांकित 100 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. लोकांच्या मागणीनुसार शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जातपडताळणी कार्यालये सुरु केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी सबलीकरण योजनेंतर्गत 8 लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येत आहे. ज्यांची घरे खराब आहे, ज्यांना घरे नाहीत अशा लोकांना रमाई आवास योजनेंतर्गत शासनामार्फत मोठ्या प्रमाणात घरे देण्यात येत आहेत. समाजिक न्याय विभागामार्फत समाज मंदिर, बौद्ध विहार यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जाईल. यापुढे तरुण पिढी व्यसनापासून दूर रहावी यासाठी गावपातळीवर व्यसनमुक्ती समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अनूसचित जातीच्या लोकांकडे जमिनी नाहीत, यासाठी दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना करुन सामाजिक न्याय विभागातील वसतिगृहातील मुलांच्या सोयी-सुविधा देण्यासाठी कुठेही कमी पडू नका. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या माध्यमातून वंचितांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी, असे आवाहनही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी शेवटी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण हे सातार्‍यात घेतले, असे सांगून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भासेले पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च्या हिंमतीवर आणि जिद्दीवर पुढे शिक्षण घेतले. जगातील अनेक घटनांचा अभ्यास करुन त्यांनी आपली घटना तयार केली. या घटनेमध्ये कोणत्याही माणसावर अन्याय होणार नाही याचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणारी सामान्याला न्याय देणारी राज्य घटना आपल्याला मिळाली. सर्वधर्म समभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्यांचे विचार प्रत्येकाने जोपासणी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी ग्रंथालय, संगणक याहस इतर साहित्य उपलब्ध करुन दिले जाईल, असे आश्वासनही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी दिले.
यावेळी अशोक गायकवाड, बबनराव कांबळे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले तर आभार समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular