सातारा ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साता-यात गेले. येथूनच खर्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ झाला. 7 नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे इयत्ता पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासन स्तरावर साजरा व्हावा यासाठी शाळा प्रवेश दिन चळवळीचे प्रवर्तक साहित्यिक अरुण जावळे मागील 15 वर्ष महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरत होते. या आग्रहाला दाद देत सरकारने गतवर्षी विद्यार्थी दिवस घोषित केला. आता हा विद्यार्थी दिवस भारतभर साजरा होण्यासाठी अरुण जावळे यांनी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले असून केंद्रिय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्याशी मसविधानफ या निवासस्थानी चर्चाही केली आहे. डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन व डॉ. अब्दूल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा होणे आवश्यक आहे. राष्ट्रपती कोविंद व प्रधानमंत्री मोदी यांच्या सहकार्यातून हा निर्णय झाला पाहिजे, अशी विनंतीही ना. आठवले यांच्याकडे अरुण जावळे यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाने छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल कमालीचे चर्चेत आले आहे. ही शाळा पहावयास देशाच्या कानाकोप-यातून लोक येत आहेत. या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात यावा यासाठी मंत्रालयाकडे आग्रहही धरला आहे. जुलैमध्ये मुंबई आणि नागपूरमध्ये काही मंत्र्याशी यासंबधाने महत्वपूर्ण चर्चाही झाली असून त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती स्थापण्यात आली आहे. छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल हा ऐतिहासिक ठेवा आहे. तो जतन करणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शाळेचे विद्यार्थी होत त्यामुळे या शाळेला अनन्यसाधारण महत्व आहे, असे स्पष्ट करुन अरुण जावळे यांनी सांगितले की, जगात आजपर्यंत सर्वात हुशार विद्यार्थी कोण होऊन गेला यासंबंधीचे संशोधन मध्यंतरी झाले. इंग्लंड, अमेरिका येथील कोलंबिया, ऑक्सफर्ड अशा नामवंत विद्यापीठांनी यासाठी पुढाकार घेतला. हे संशोधन बरेच माहिने सुरु राहिले. नामवंत विद्यापीठांमधली तज्ज्ञ यामध्ये सक्रियपणे राबत होते. या संशोधनातून एक नंबरसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नांव पुढे आले. याशिवाय पृथ्वीवर अनेक महापुरुषांचे असंख्य पुतळे आहेत. परंतु जगात इतर कोणत्याच महापुरुषाच्या पुतळ्याखाली नॉलेज ऑफ सिम्बॉल असे कोट करण्यात आलेले नाही. कोलंबिया विद्यापीठात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्यावर नॉलेज ऑफ सिम्बॉल असे कोट करण्यात आलेले आहे.
हे सर्व गौरवपूर्ण दाखले देण्याचे तात्पर्य असे, अफाट अन् अचाट बुध्दिमत्ता लाभलेले आभाळ उंचीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलचे विद्यार्थी होत. शाळेच्या रजिस्टरला आजही त्यांचे नाव भीवा रामजी आंबेडकर असे असून 1914 क्रमांकाला तशी नोंद आहे.
प्रवेश घेताना या शाळेच्या मनाला आणि तेथील मातीच्या कणाला पूसटशी कल्पनाही नसेल की हा बाल भीवा भविष्यात जगातला आदर्श विद्यार्थी ठरेल. परंतु हे सारं भीवाने आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर खरं ठरवले. मी तर असे म्हणेन या शाळेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य जगाला मिळाला. या शाळेत त्यांचे पाऊल पडले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुध्दा त्यांना प्राप्त झाले. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नाही तर या आज जगाचे प्रेरणास्थान ठरलेलं आहे. एका बाजूला देदिप्यमान असा वारसा या हायस्कूलला असताना दुस-याबाजूला मात्र या हायस्कूलवर अखेरचा श्वास मोजण्याची वेळ आलेली आहे. विद्यार्थी मिळण्यापासून ते शाळा जतन करण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करु पहात आहे. तेव्हा राज्य आणि केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष पुरवणे गरजेचं असल्याचेही अरुण जावळे यांनी सांगितले.
विद्यार्थी दिवस घोषित व्हावा यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीजवळ 125 विद्यार्थ्यांसह जलसमर्पण करण्याची भूमिका घेतली होती, तशी वेळ सरकारने आणू नये असा इशाराही त्यांनी दिला.
सातारचा डॉ. आंबेडकर विद्यार्थी दिवस आता देशभर ! अरुण जावळे यांचे शर्थीचे प्रयत्न
RELATED ARTICLES