कराड : वैद्यकिय क्षेत्रातील प्रदीर्घ रूग्णसेवा, बँकेच्या माध्यमातून केलेले अर्थकारण, विविध संस्थांमधून केलेले सामाजिक कार्य यामुळेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने डॉ. सुभाष एरम यांची सहकारमहर्षी कै.विष्णुअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार 2018 साठी केलेली निवड सार्थ आहे असे उदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी काढले. रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबईच्या वतीने आयोजीत पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबईच्या वतीने सहकारमहर्षी कै. विष्णुअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार 2018 यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झाली. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते व राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमात राज्यातील सहकारी बँकांना व बँकेत काम करणार्या सेवकांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या कार्याध्यक्षा सुप्रिया पाटील, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, असोसिएशनचे पदाधिकारी, संचालक, कराड अर्बन बँकेचे सर्व संचालक, वरिष्ठ अधिकारी, राज्यातील विविध बँकांचे पदाधिकारी व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज सहकार क्षेत्रात सातत्याने बदल होत असताना हे बदल स्वीकारून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कराड अर्बन बँकेच्या माध्यमातून डॉ. सुभाष एरम यांनी सहकार क्षेत्रात केलेले कार्य आदर्शवत असून त्यांच्या या कार्याचा आदर्श राज्यातील सहकार क्षेत्रातील संस्थांनी घ्यावा असे सांगून ते पुढे म्हणाले की, आज सहकार क्षेत्र संक्रमणातून प्रवास करत आहे. सहकारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सहकार सक्षम करण्याची गरज आहे. सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगिण प्रगतीचा मार्ग हा सहकारातून जात असल्याने सहकारी चळवळ व्यापक करण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन यासाठी आवश्यक ते प्रयत्न करीत आहे ही बाब सहकाराच्या संवर्धनासाठी पोषक आहे. याप्रसंगी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, राज्यातील सहकारी बँका जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख व्हाव्यात यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असून बँकिंग प्रणालीमध्ये येत असलेले बदल स्वीकारून बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून बँकिंग सेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे.डॉ. सुभाष एरम यांना सहकार क्षेत्रातील राज्यपातळीवरील सन्मानाचा मानला जाणारा सहकारमहर्षी कै.विष्णुअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार 2018 हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या कार्याध्यक्ष सुप्रिया पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. शेवटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे यांनी आभार मानले.
डॉ. सुभाष एरम महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
RELATED ARTICLES