वाई ः उन्हाळी सुट्टयाच्या अनुषंगाने लहान मुलांच्या मनोरंजनासाठी वाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरील वाई नगरपालिकेच्या प्रास्तावित भाजी मंडईच्या जागेवर लहान मुलांसाठी सुरू असलेले डिजनीलँन्डवाले ( विविध खेळणी व मनोरंजनाचे प्रकार ) वाईतील मुलांच्या जीवाशी खेळत असून दररोज हजारो रुपये कमवत आहेत. याठिकाणी कोणतीही आपत्कालीन व अत्यावश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. केवळ मनोरंजन कर घेणारे पालिका प्रशासन लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का करत आहे.? याविषयी आश्चर्य व संताप ही व्यक्त केला जात आहे.
शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानंतर शाळकरी मुलं खेळण्याचा व फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत, शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेले विविध खेळांची प्रशिक्षण शिबीरे, नृत्य शिबीरे, पोहणे यात अनेक मुलं सहभागी झाली आहे, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला आता काही दिवस उरली आहेत, त्यामुळे मुलांबरोबर पालक ही मौजमस्ती करण्यात दंग आहेत, सायंकाळी महागणपती घाट, शिवाजी उद्यान मुलं व पालकांनी फुलून जात आहे, गेली काही दिवसांपासून वाई नगरपालिकेच्या प्रस्तावित भाजी मंडईच्या जागेवर मुंबईतील एका ठेकेदाराने लहान मुलांसाठी लहान- मोठे झोपले, व अन्य अनेक प्रकारच्या खेळण्याचे साहित्य तसेच विक्रीसाठी खेळणी ही ठेवली आहेत. याठिकाणी आणले आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ते चालू आहे. पालक रोज मुलांना याठिकाणी घेऊन येत असल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. गेली काही वर्षे हा ठेकेदार मे मध्ये वाईला येत आहे. काही स्थानिक पुढार्यांना हाताला धरून किंबहुना त्याच्या नावावरच हे दुकान चालवत असून तो केवळ त्या पुढार्यांच्या वशिल्याने महिनाभर बखळ पैसा कमावतो. मिळालेल्या माहितीनुसार या ठेकेदाराने वाई पोलिसांकडून स्पीकर परवाना व वाई नगर पालिकेकडून मनोरंजन कर व अन्य एखादी परवानगी घेतल्याचे समजते.अवघ्या एक- दोन परवानग्या मिळवून विजेवर चालणारी अनेक लहान- मोठी चक्र व अन्य उपकरणे इथे उभी आहेत. दररोज शेकडो मुलं व पालक इथे येत असून आनंद लुटत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली खेळ सामग्री त्याने छोटया जागेत अडजेस्ट केली असून सुरक्षिततेच्यादृष्टीने कसलीच उपाययोजना त्या ठेकेदाराने इथे केली नाही. विजेवर चालणार्या ….. उपकरणांना ज्या केबल वापरल्या आहेत त्या अनेक ठिकाणी चिकटपट्टीने चिकटवल्या आहेत. दुर्दैवाने शॉर्टसर्किट होऊन जर आग लागली तर ती आग विझवण्यासाठी या ठेकेदाराकडे कसलीच यंत्रणा नाही. पोलिसांनी स्पीकर परवाना देऊन त्याची जबाबदारी पार पडली, नगर पालिकेने ही मनोरंजन कर भरून घेत आपली जबाबदारी पार पाडली. आता विषय राहिला इथल्या आपत्कालीन यंत्रणेचा ! ती देखरेख कोणाच्या अखत्यारीत येते ? पालिका का पोलीस ? का ठेकेदार ? पालिकेची असेल तर त्यांनी आपत्कालीन यंत्रणा नसताना या डिजनीलँन्डला का परवानगी दिली ? पोलिसांच्या अधिकारात असेल तर त्यांनी तो सर्वे केला का ? आणि जर स्वतः त्या ठेकेदाराची असेल तर ती आपत्कालीन व्यवस्था कुठे आहे ?
इथं येणार्या मुलं व त्याचा पालकांची गर्दी पहिली, इथल्या चालू उपकरणाच्या जीर्ण केबल पहिल्या तर दुर्दैवाने शॉर्टसर्किट होऊन जर आग लागली तर मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते. त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. वाईतील अनेक जागरूक नागरिकांनी हा प्रश्न पत्रकाराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जेंव्हा प्रत्यक्ष पाहणी केली तेंव्हा या ठिकाणी कसलीच आपत्कालीन यंत्रणा अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. आपत्कालीन यंत्रणेचा विषय पोलीस की पालिक यांच्या अखत्यारीत येतो का ? हा महत्त्वाचा नसून मुलांची सुरक्षितता म्हणू न एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा ती त्या ठिकाणी कशी लवकरात लवकर उपलब्ध करता येईल हे पाहणं महत्त्वाचे आहे. अन्यथा संभाव्य धोका म्हणून हे डिजनीलँन्ड तात्काळ बंद करण्याची मागणी दक्ष नागरिक फाऊंडेशन या सामाजिक संघटनेने केली आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, आश्चर्य व संताप व्यक्त
RELATED ARTICLES