वडूज: येथील मुख्य रस्त्यावरील उर्वरित अतिक्रमणे काढण्यावरून काही मिळकत धारक व ग्रामस्थांमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला. हा तणाव पोलीसांच्या मध्यस्थीने आटोक्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी मिरज – भिगवण राज्य मार्गावरील खटाव तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या कातरखटाव येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम ग्रामपंचायत ने गत पंधरा दिवसांपासून हाती घेतली आहे.त्यानुसार कामही सुरू आहे.ग्रामस्थांनी या मोहीमेस चांगला प्रतिसाद दिला आहे.मात्र काही लोकांनी त्यांचे अतिक्रमण काढण्यास विरोध केल्याने ती काढली गेली नाहीत.संबंधितांना नोटीस ही बजावण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेतील अजेंडयावरील उर्वरित अतिक्रमणाचा विषय चर्चेसाठी येताच सर्व ग्रामस्थांनी संबंधिताकडे जावून अतिक्रमण काढण्यास भाग पाडण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. त्यानुसार ग्रामसभा संपताच सर्व गावकरी संबंधिताच्या घरी गेले. अतिक्रमण काढण्यासाठी विनंती केली. मात्र संबंधितांनी अतिक्रमण काढण्यासाठी विरोध करत जबरदस्तीने अतिक्रमण काढल्यास आम्ही सर्व कुटुंबिय आत्महत्या करू असा पवित्रा घेतल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरपंच तानाजीशेठ बागल यांनी घटनेची हकीकत वडूज पोलीस ठाण्याचे स.पो.नि. यशवंत शिर्के यांना भ्रमणध्वनी वरून दिली. काही वेळातच शिर्के व सहकारी घटनास्थळी दाखल झाले.व पोलीस बंदोबस्तातच सदरचे अतिक्रमण हटविण्यात आले.
( छाया : समीर तांबोळी )