सातारा : भारत देशामध्ये आजही 82 टक्के महिला, मुली, युवती मासिक पाळीच्या कालावधीत सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत ही धक्कादायक व दु:खद बाब आहे. महिला सुरक्षित तर देश सुरक्षित, यामुळे आपल्या घरातील महिलांना सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाचे काम असल्याची भावना अभिनेता अक्षयकुमार याने व्यक्त केली. कोल्हापूर परिक्षेत्रीय युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप अंतिम स्पर्धेच्या शुभारंभाला अक्षयकुमारने मराठीतून महिला पोलिस व युवतींशी थेट प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधत सातार्यातील तरुणाईची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अक्षयकुमार याने मराठीतून सुरुवात करत उपस्थितांची मने जिंकली. भाषणबाजीला फाटा देवून महिला पोलिस व युवतींना माईक देवून थेट प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. चित्रपटामध्ये नायकांनाच का प्रमुख भूमिका दिली जाते? सामाजिक चित्रपटात काम करताना कसे वाटते? खेड्यातील महिलांना पॅड विषयी माहिती नसल्याने काय केले पाहिजे? महिला सुरक्षेसाठी काय सांगाल? असे विविध प्रश्न विचारण्यात आले.
उत्तर देताना अक्षयकुमार म्हणाला, चित्रपटामध्ये नायिकांनाही मुख्य भूमिकेचा रोल दिला जात असून तसे अनेक चित्रपट झालेले आहेत. तुम्हाला तसे वाटत नसेल तर मी माझ्या प्रोडक्शनच्या माध्यमातून नक्कीच नायिकांना मुख्य भूमिका देईन. यावेळी प्रश्न विचारलेल्या मुलीला तुलाच मुख्य भूमिका देतो, तुमी या आणि भेटा असे सांगून त्याने आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, शहरातील महिलांना सॅनिटरी नॅपकीनविषयी माहिती असते मात्र खेड्यातील महिलांना याबाबत माहिती नसून त्याचे प्रमाण 82 टक्के असल्याचे वास्तव आहे.
सॅनिटरी नॅपकीन न वापरल्यामुळे कॅन्सरचे प्रमाणही वाढत आहे. महिला सुरक्षित तर देश सुरक्षित हे प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवून घरातील प्रत्येक महिलेच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे. पॅडमॅन हा माझ्यासाठी चित्रपट नसून ती एक चळवळ आहे, यामुळे सर्वांनी या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहनही केले.
जिल्हा परिषदेच्या नवीन हॉलमध्ये शनिवारी सकाळी अक्षयकुमार याचा महिला पोलिस व महाविद्यालयीन युवतींशी संवाद हा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरीक्त जिल्ह पोलिसप्रमुख विजय पवार, पोनि पद्माकर घनवट उपस्थित होते.
महिलांना सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाचे काम : अक्षय कुमार
RELATED ARTICLES