औंध वार्ताहर :- शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो. हे लांडेवाडी ता खटाव येथील छोट्या शेतकऱ्यांने सिद्ध करून दाखवले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत
काबाडकष्ट करत जिरायती शेती करून उदरनिर्वाह करणारे शहाजी सुर्यवंशी यांनी दहा हजार रुपयांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देऊन इतरापुढे आदर्श ठेवला आहे.
कोरोना सारख्या भयंकर आजारामुळे लाँकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याने सर्व उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. भीषण आजाराचा सामना करण्यासाठी शासनाने आपली तिजोरी खुली केली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक संस्था, ट्रस्ट, बँका, पतसंस्था उद्योजक पुढे सरसावले आहेत आपापल्या परीने शासनाच्या तिजोरीत मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र लांडेवाडी सारख्या डोंगरात वसलेल्या छोट्या शेतकऱ्यांने देखील या लढाईला बळ देण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. शेतीच्या उत्पन्नातून बचत केलेल्या पूंजीतून दहा हजाराची रक्कम स्टेट बँकेच्या औंध शाखेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता वर्ग केली आणि इतरासमोर आदर्श ठेवला आहे.