सातारा : काहीही झाले तरी गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार, असे ठणकावतानाच, सनबर्नला परवानगी देता मग डॉल्बीला का नाही? असा सवाल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज येथे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलताना केला.
गेले काही दिवस गणेश विसर्जनाच्या प्रश्नावरुन सातार्यात वादळ उठले आहे. पोलीस, प्रशासन तसेच न्यायालय यांच्या निवाड्यावरुन गणेश विसर्जनासंदर्भात दरराजे नवनव्या विघ्नांची मालिका सुरु आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. सातार्यातील मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास खा. उदयनराजे भोसले यांनी परवानगी दिली असली तरी त्या अनुषंगाने दररोज प्रश्न उपस्थित केले जात असल्यामुळे संभ्रम वाढला आहे. मंगळवार तळ्यात विसर्जन केल्यास न्यायालयाचा अवमान होईल, असे वातावरण तयार करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खा. उदयनराजे यांच्या उपस्थितीत मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक बोलविण्यात आली होती. खा. उदयनराजे यांच्या रोखठोक व सडेतोड भूमिकेमुळे ही बैठक खर्या अर्थाने वादळी ठरली.
बैठकीत बोलताना खा. उदयनराजे यांनी पोलीस व प्रशासनाच्या धार्मिक कार्यात कोलदांडा घालण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली. काही क्रियानिष्ठ लोकांमुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेश विसर्जना दिवशी जर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास पोलीस व प्रशासनच जबाबदार असेल. मंगळवार तळे आमच्या मालकीचे आहे. त्यामुळे त्याबाबत काय निर्णय घ्यायचा तो अधिकार आम्हालाच आहे. तळ्यात विसर्जन करण्यास आम्ही यापूर्वीच परवानगी दिली आहे. तळे आमच्या मालकीचे असल्यामुळे न्यायालयाचा अवमान होण्याचा प्रश्नच येत नाही. कारवाई व्हायची असेल तर ती आमच्यावर होईल. कार्यकर्त्यांवर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत रहावे, असे उदयनराजे म्हणाले. उद्या तुम्ही म्हणाल, उदयनराजे यांनी जलमंदिरात जावू नये. तुमचा काय संबंध? आमच्या घरात आम्ही काय करायचे तो आमचा प्रश्न आहे. या लोकांना कायदा कळतो की नाही, हा प्रश्नच आहे. खरेतर यांनी या संदर्भात पोलीस महासंचालकांकडून अभिप्राय मागवायला हवा होता, अशा शब्दांत त्यांनी पोलीस यंत्रणेला फटकारले. प्रत्येक उत्सवावेळी कोलदांडा घालण्याची पोलीस व प्रशासनाची भूमिका योग्य नाही. लोकांच्या मनात भय निर्माण करणे बरोबर नाही, असे सांगून उदयनराजे यांनी आपण सदैव कार्यकर्त्यांच्या पाठिशी आहोत, याचा पुनरुच्चार केला.
याप्रसंगी डॉल्बीचा विषयही उपस्थित झाला. पुण्यात सनबर्नफला परवानगी देता, तर मग डॉल्बीला का नाही? असा खणखणीत सवाल त्यांनी याप्रसंगी केला. या संबंधी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत. डेसिबलची मर्यादा घालून डॉल्बीला परवानगी द्यायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील साखर कारखाने तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात वायू व जल प्रदुषण होत आहे. त्याबाबत प्रशासन काय करत आहे? काही लोकांना प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याची सवय लागली आहे. शहराचा विकास व्हायचा असेल तर अशा प्रवृत्तींना आवर घालणे गरजेचे आहे. कारण नसताना जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या प्रश्नात गोंधळ घातला आहे. गणेश विसर्जन मार्ग ठरविण्याचा यांना काय अधिकार? नगरपालिकेच्या हद्दीबाहेर गणपती का न्यायचा, असे प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे हा सारी व्यवस्थाच मोडित काढण्याचाच प्रकार आहे. कार्यकर्त्यांवर जर गणेशोत्सवात गुन्हे दाखल झाले तर त्यांच्या पाठिशी आपण स्वत: उभे राहणार आहोत, असा शब्द खा. उदयनराजे यांनी शेवटी दिला.
यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, प्रतोद ऍड. दत्ता बनकर, प्रकाश गवळी, भाजपचे विजय काटवटे, नगरसेविका सिद्धी पवार, माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, मंडळांचे पदाधिकार्यांसह सातारा शहरातील नागरिक उपस्थित होते.