सातारा : सातारा नगरपरिषदेच्या छ. शिवाजी सभागृहात गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने मंडळांचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. यावेळी मंगळवार तळे खाजगी मालकीचे असले तरी संबंधितांची परवानगी घेऊन पूर्वीप्रमाणे यंदा विसर्जन करण्याचे म्हणणे बहुतांश लोकांमधून समोर आले. त्यानुसार प्रशासनाने घेतलेल्या आढाव्यानुसार न्यायालयीन निर्णयात कोठेही विसर्जनाबाबत बंदी नसताना अवलोकन करून निर्णय होणार असल्याचे अपेक्षित आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार बैठक पार पडली असल्याने ते मंगळवारी आल्यानंतर निर्णय लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
गणेश विसर्जनाचा मुद्दा ऐरणीवर असताना कृत्रिम तळ्याला सातारकरांमधून वाढता विरोध पाहता सातारकरांनी जिल्हाधिकार्यांसमोर नाराजी व्यक्त करत गोडोली तळ्यात विसर्जन करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाचे विसर्जनाबाबत बंदीचे निर्देश नसताना गेल्या दोन वर्षांपासून हा घाट का घातला जात आहे, असा प्रश्न बहुतांश नागरिकांनी चर्चेत उपस्थित केला. बाळासाहेब बाबर, प्रकाश गवळी यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढताना कोणाला पोसण्यासाठी पालिकेच्या बोकांडी खर्च लादला जात आहे आणि प्रशासन चुकीच्या बाबींना बळी पडत असल्याचे निक्षून सांगितले. पूर्वी पालिका विसर्जन मिरवणूक नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काढत होती. त्याप्रमाणे आता तिच प्रथा अंमलात आणण्याची मागणी केली. मोती आणि फुटके तळे पालिकेच्या मालकीचे तर मंगळवार तळे खाजगी मालकीचे असल्याने त्यांची परवानगी घेऊन पूर्वीप्रमाणे विसर्जन करण्याची मागणी एकमुखी करण्यात आली. विजय काटवटे यांनी लोकांच्या हृदयात हात घालत मंगळवार-मोती तळ्याबाबत हात वर करून मत व्यक्त करण्याचे आवाहन केले, त्यानुसार उपस्थितांपैकी बहुतांश हात वर झाले. त्यामुळे सर्वानुमते कृत्रिम तळ्याचा पांढरा हत्ती सातारकरांच्या नको माथी अशी भावना बैठकीत रूढ झाली.
सामाजिक मुखवटा धारण करून न्यायालयात याचिका करणारे कोणाचे बाहुले आहेत, हे नागरिकांना माहित असून त्यांच्या कृत्रिम दुकानदार्या बंद करण्याची मागणी नगरसेविका आशा पंडीत यांनी केली. न्यायालयाच्या निर्णयात तळ्यात विसर्जनाला बंदी नसून जिल्हाधिकार्यांना परवानगी न मागता पूर्वीप्रमाणे तळ्यात विसर्जन करावे. कोणतीही तक्रार झाल्यास प्रशासनासोबत सातारकर असल्याचे जितेंद्र वाडकर यांनी सांगितले. मंगळवार तळ्यात विसर्जनाला माझा विरोध नसून विसर्जनानंतर तात्काळ स्वच्छता केल्यास रहिवाशांना त्रास होणार नाही, असे लेखी पालिकेने द्यावे, अशी मागणी हेमांगी जोशी यांनी केली. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर नगरसेवक अशोक मोने, सुहास राजेशिर्के, दत्तात्रय बनकर आणि स्मिता घोडके यांनी समिती गठीत करून तळ्यात विसर्जन करण्याबाबत निर्णय घेण्याचे जाहीर करण्यात आले.
मंडळांना सुलभरीत्या परवानग्या द्या : शहाणे
धर्मादाय, पोलीस आणि पालिकेच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना पालिकेने सुरु करावी. मंडळांना सुलभरीत्या परवानगी देताना बाप्पांच्या आगमन आणि विसर्जनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करावा. तसेच मंडळांच्या पदाधिकार्यांशी बोलून लोकहिताचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, अशी स्तुत्य मागणी प्राची शहाणे यांनी केली.