पाटण:- सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील केस कर्तन करणारा नाभिक समाज आहे. या समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन केवळ सलून व्यवसाय आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लौकडाऊन काळात सलून व्यवसाय पूर्ण बंद असून या व्यवसायावर जगणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा अडचणीच्या काळात शासनाने सलून व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजाला मदतीची घोषणा करावी अथवा इतर व्यवसायांना जशा नियम-अटी लागू करून व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी दिल्या आहेत तशा नियम-अटी लावून केस कर्तन व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी स्वाभिमानी नाभिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले सातारा जिल्ह्यातील सलून व्यवसायावर ९० टक्के नाभिक समाज अवलंबून आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाभिक समाजाचा सलून व्यवसाय पूर्णतः बंद आहे. या व्यवसायावर जगणाऱ्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. केस कर्तन करताना आनेकांच्या संपर्कात यावे लागते. हे आजच्या काळात पुर्णतः धोकादायक आहे. हा धोका टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नाभिक समाज कुठल्याही प्रकारचे केस कर्तन अथवा व्यवसाय करणार नाही. मात्र केस कर्तन करणाऱ्या नाभिक समाजावर आलेली उपासमारीची वेळ शासनाने समजून घेऊन या समाजाला मदतीची घोषणा करावी अथवा इतर व्यवसायांना जशा नियम-अटी लागू करून व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी दिल्या आहेत तशा नियम-अटी लावून केस कर्तन व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी द्यावी.
आज दीड महिना झाला सलुन व्यवसाय बंद आहे. सातारा जिल्ह्यात अडिच ते तीन हजार सलुन व्यवसाय आहेत. आणि या मध्ये ९५ टक्के सलून दुकाने भाडे तत्वावर आहेत. आज काही वेळ इतर व्यवसाय सुरू ठेवावे व काही व्यवसाय बंद ठेवावे असे वेळापत्रक सरकार काढत आहे. मात्र त्यामध्ये नाभिक समाजाचा कुठेही उल्लेख केला जात नाही. सलून व्यवसायावर नाभिक समाजातील अनेक कुटुंबाचे हातावरचे पोट आहे. हातावरच्या पोटासाठी समाजातील काही बांधव लपून छपून व्यवसाय करताना आढळले. यातूनच वनवासमाचीचा प्रकार घडला तो भयंकर आहे. तसेच प्रकार अजून घडतील याची समाजाला भिती आहे. यामुळे शासनाने नाभिक समाज व सलून व्यवसायाचा गांभीर्याने विचार करून मदतीची घोषणा करावी अशी मागणी स्वाभिमानी नाभिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी केली आहे.