पाटण: पत्रकार हा समाज घडवतो. समाजाशी संवाद साधण्याचे काम पत्रकार करत असतो. साहित्यातून खूप माहिती मिळते. साहित्याने जग खूप जवळ आणले आहे. साहित्यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते. आज वाचन संस्कृती लोप पावत चालल्याने कुटुंबातील सुसंवाद नाहीसा होत आहे. विक्रमबाबांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ आयोजित केलेले ग्रंथ महोत्स व साहित्य संमेलन हे नव्यापिढीला सुसंस्कृत करून वाचनाची आवड निर्माण करणारे आहे. त्यामुळे अशी साहित्य संमेलने वारंवार झाली पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ माध्यम तज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी केले.
स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाच्या समोरापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, सुधाताई मेहेंदळे, ए. व्ही. देशपांडे, हरीष भोमकर, पाटण तालुका पत्रकारसंघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र उर्फ बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मेहेंदळे म्हणाले, दोन माणसांमधील संवाद नाहीसा झाला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची गर्दी कमी होताना दिसत आहे. वाचन, मनन कमी होताना दिसते. त्यासाठी लोकांना वाचनाकडे वळविले पाहिजे. साहित्याने आपल्याला काय दिले हे जाणून घेतले पाहिजे.
साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे. साहित्यातून चांगल्या विचारांची देवाण घेवाण करून आनंदी जीवन जगले पाहिजे. शहरातील मोठ्या साहित्य संमेलनाला शासन निधी देत आहे असा निधी ग्रामीण भागात होणार्या संमेलनाला मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, ग्रामीण भागात अशी साहित्य संमेलने होणे गरजेचे असून विक्रमबाबांनी हे धाडसाचे पाऊल टाकले आहे. साहित्य संमेलन हे राजकारणाच्या पलिकडचे व्यासपीठ आहे.
राज्य सरकार शहरातील संमेलनाला निधी देेत त्या तोडीचे हे संमेलन आहे. साहित्य संमेलनातून वेगवेगळे विचार ऐकण्यास मिळतात, असे सांगून ते म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पत्रकार, कवी, साहित्यिक, लेखक यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. त्यांना लोकनेते ही पदवी पत्रकार, लेखक आचार्य आत्रे यांनीच दिली. एक मित्र म्हणून विक्रमबाबा पाटणकर यांना माझी नेहमीच साथ राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारसंघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र उर्फ बाळासाहेब पवार म्हणाले, देशाच्या जडणघडणेत पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून पत्रकार आपल्या लेखणीतून समाजाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. अटल बिहारी वाजपेयी, दिनदयाळ उपाध्याय, प्र. के. अत्रे, अगरकर, टिळक यांनी देखील पत्रकारितेच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात व देश स्वातंत्र्याच्या लढ्यात केलेली कामगिरी विसरता येणार नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना लोकनेते पदवी ही पत्रकारांनीच दिली.
विक्रमबाबा पाटणकर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले. डॉ. विना नांगरे यांनी सुत्रसंचालन केले. अशोकराव देवकांत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास विजया म्हासुर्णेकर, आयेशा सय्यद, फत्तेसिंह पाटणकर, जगदिश पाटणकर, बशीर खोंदू, नथुराम कुंभार, अरूण घोणे, राजू कांबळे, योगेश महाडीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक, महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.
ग्रंथ महोत्सव साहित्य संमेलन हे नव्या पिढीला सुसंस्कृत करते : डॉ. विश्वास मेहेंदळे
RELATED ARTICLES