Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीतुतारीच्या गर्जनासह गुरव समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

तुतारीच्या गर्जनासह गुरव समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सातारा : देवस्थान इनाम वर्ग 3 चे हक्कासाठी व खालसा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील गुरव समाजाच्या वतीने सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी सातारा जिल्ह्यात विभागलेला गुरव समाज एका छताखाली आल्याचे पाहण्यास मिळाले. तसेच पारंपारिक तुतारीच्या गर्जनामुळे गुरव समाजाच्या समस्याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
गेली 30 ते 40 वर्ष गुरव समाज आपल्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत. परंतू त्या आंदोलनाला यश येत नसल्यामुळे तसेच देवस्थान जमिनीबाबत राज्यशासनाने चुकीचा निर्णय घेऊन गुरव समाजावर अन्याय केलेला आहे. याचा निषेध करण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात सुमारे अडीज हजार हेक्टर जमीन पूर्वी गुरव समाजाच्या ताब्यात होती. गुरव समाजाने गावातील देवस्थान तसेच देवालयातील पूजाअर्चा व देखभाल कामे करावी यासाठी त्यांना पारंपारिक पद्धतीने उदरनिर्वाहासाठी या जमीनी दिल्या होत्या. परंतू गुरव समाजामध्ये जनजागृती नसल्यामुळे अनेक धनदांडग्यांनी तात्कालीन शासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून या जमीनी बळकावल्या आहेत. आजही शहरानजीकच्या जमीनीवर खुलेआम अतिक्रमण होत असूनसुद्धा त्याबाबत नगरपंचायत, नगरपरिषद कारवाई करत नाही हे दुर्दैव आहे.
संत काशीबा महाराज यांचे भक्त असलेल्या गुरव समाजाने आत्तापर्यंत देवाची सेवा केली. पण मानवाने त्यांना बेघर केेलेेले आहे. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे आज ग्रामीण भागातील गुरव समाज बड्या व्यक्तींच्या घरातील लग्न व शुभकार्यात तुतारी वाद्य वाजवून आनंद उत्सवात सहभागी होतो. पण त्याला फारसा मोबदला मिळत नाही. त्यामुळे गुरव समाज हा उपेक्षित राहिला आहे. त्यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारने करावे अशी मागणी आसगावचे माजी सरपंच राजेंद्र गुरव, संतोष पवार, सोमनाथ साखरे, शशिकांत गुरव, बाळकृष्ण गुरव यांनी केली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरव समाज संघटनेच्या अध्यक्षा नंदकुमार गुरव, सरचिटणीस अरविंद पांबरे, शिवाजीराव गुरव, दत्तोबा शिर्के, भालचंद्र गोडबोले, सौ. सुरक्षा साखरे, सौ. शारदा इंजेकर, बाबूराव गुरव, संगिता कोकीळ, रामचंद्र गुरव, प्रकाश गुरव, एकनाथ गुरव व शेकडो गुरव बांधवांच्या वतीने हे धरणा आंदोलन यशस्वी करण्यात आले. सातारा जिल्ह्याधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर आंदोलकांसाठी अल्पोहाराची व्यवस्था केली गेली होती. इतर समाजाच्या समस्या निवारणासाठी गुरव समाज सहभागी होतो. त्यामुळे गुरव समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच ओबीसी संघटना त्यांच्या पाठीशी ठाम राहिल असा विश्‍वास सुधाकर काकडे, भालचंद्र माळी यांनी व्यक्त केला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular