पाटण:- कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पाऊसाने हाहाकार माजवला असून सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर तालुक्यात सगळीकडे धो-धो पाऊसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. या पाऊसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पाटण तालुक्यातील सर्वच नद्या दुतड्या भरून वाहत आहेत. या पाऊसाने पाटण – सडावाघापूर घाट मार्गावरील गुजरवाडी येथील दरड कोसळली. तर कोयना धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून एका दिवसात ५ टि.एम.सी. ने पाणी साठा वाढला आहे. धरणातील एकूण पाणी साठा ७३ टि.एम.सी. झाला आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद ६२ हजार क्युसेस आहे.
पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या सततधार पाऊसाने कोयना धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचा पाणी पातळी २१३३.०३ फूट, ६५०. २१५ मीटर, पाणी साठा ७२.९५ टि.एम.सी. इतकी नोंद मंगळवारी सांयकाळी ५ वा. झाली आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद ६२,१९७ हजार क्युसेस आहे. तर सकाळी ८ वा. ते सांयकाळी ५ वा. पर्यंत या नऊ तासात कोयना येथे १०५ मि.मी. (एकुण- ३१५३मि.मी.), नवजा- १४६ मि.मी. (एकुण- ३७०७मि.मी.), महाबळेश्वर- ५६ मि.मी. (एकुण- ३०७०मि.मी.) नोंद झाली आहे.
कोयनेसह पाटण तालुक्यात मोरणा- गुरेघर, निवकणे, चिटेघर, तारळी, वांग-मराठवाडी या लघुपाटबंधारे धरण परिसरात पाऊसाची धुवाधार सुरू असुन यामुळे हि सर्व कोयना वगळता पाटण तालुक्यातील इतर सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. तर कोयना, केरा, मोरणा, काजळी, उत्तरमांड, तारळी, वांग या नद्याच्या पाणि पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने या नद्या तुडुबं भरुन वाहत आहेत. मोरणा नदीवरील कुसरुंड – आडदेव पुलावरून पाणी जात आहे. तर या पाऊसाने पाटण – सडावाघापूर घाट मार्गावरील गुजरवाडी येथील दरड कोसळली. या कोसळलेल्या दरडीमुळे घाटात तीन तास वाहतूक ठप्प होती. प्रशासकीय व स्थानिक नागरीकांच्या मदतीने कोसळलेली दरड बाजूला करून घाट रस्ता मोकळा करण्यात आला.
दरम्यान पाटण तालुक्याच्या सर्व विभागातही पावसाने कहर केला असून जोरदार पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या पाच दिवसा पासून मुसळधार पावसामुळे नद्या, ओढ्याना पूर आल्याने पाटण नवीन बसस्थानकात आणि आजूबाजूच्या दुकान गाळ्यात पाणी शिरले होते. यात प्रवाश्यांचे मोठे हाल झाले. दुपारी पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरळीत झाली. संततधार पावसामुळे दुर्गम डोंगराळ भागातील जनता मात्र चांगलीच गारठली आहे.