कोरेगाव: सातारा-म्हसवड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. कोरेगाव ते सातारा दरम्यान ते काही महिन्यापासून बंद असून, सस्थितीत रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने कोरेगावकर नागरिक या विषयावर आक्रमक झाले आहेत. प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता डी. डी. बारवकर यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबती केली. ठेकेदार कंपनीसह तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा प्रशासनाने दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान, महामार्गाचे काम गतीने पूर्ण करण्याची जबाबदारी असून, ती पार पाडू, अशी ग्वाही बारावकर यांनी दिली.
महामार्गाच्या कामाच्या अनुषंगाने सातत्याने येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांनी गुरुवारी आपल्या कार्यालयात अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक बोलवली होती. त्यामध्ये नगरविकास कृती समिती, सोनेरी ग्रुपच्या पदाधिकार्यांसह नागरिकांनी हल्लाबोल केला. नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ठेकेदार कंपनीचे अधिकारी अक्षरशः गांगरुन गेले होते.
संतोष नलावडे, राजेश बर्गे व पृथ्वीराज बर्गे यांनी आक्रमक शैलीत आजवर झालेल्या दोन अपघातात दोन निष्पापांचा जीव गेला असून, त्याला महामार्गाचे निकृष्ट आणि नियोजनशुन्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोप केला. दोघांच्या मृत्युस अभियंते आणि ठेकेदार कंपनीच जबाबदार असून, त्यांच्यावर प्रशासनाने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. जर प्रशासन गुन्हे दाखल करणार नसेल तर आम्ही सातारा शहर आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करु, असा इशारा दिला.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, नगरसेवक संजय पिसाळ, सी. आर. बर्गे, मधुकर शेंबडे यांच्यासह महागाव येथील ग्रामस्थांनी महामार्गाच्या अनुषंगाने येणार्या अडचणी विषद केल्या आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. कोरेगाव शहरात महामार्ग कसा असेल, त्यासाठी कोणते धोरण आहे, नगरपंचायतीला याबाबत माहिती देण्यात आलेली नाही, पदाधिकारी, नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहरातून जाणारा महामार्ग सुशोभित करावा, अशी मागणी पिसाळ यांनी केली. अॅड. विक्रम बर्गे यांनी महामार्गावर असलेले धुळीचे साम्राज्य, शेतकर्यांच्या शेतात बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेला भराव, मुरुमाचे भल्या मोठ्या उंचीचे भराव, याबाबत प्रश्न उपस्थित केले. अभिजित बर्गे व हेमंत जाधव यांनी ठेकेदारावर केलेल्या कारवाईची माहिती देण्याची मागणी केली.
महामार्गाच्या कामाच्या अनुषंगाने झालेल्या संयुक्त बैठकीत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे व परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांनी चर्चेत भाग घेतला नाही. बैठकीतील मुांबाबत ते माहिती घेत होते. बैठक संपण्यापूर्वीच परिवहन विभागाचे अधिकारी निघून जाऊ लागले, त्यांना सौ. नलावडे यांनी परत बोलावून घेतले. त्यानंतर धोकादायक ऊस वाहतुकीबद्दल त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करण्यात आला, त्यावेळी त्यांनी रिफ्लेक्टर लावण्याबाबतची कार्यवाही केली जाईल, असे उत्तर दिले. ओव्हर लोड, ट्रॅक्टरच्या कसरती याबाबत त्यांनी कोणतीही सूचना केली नाही, अथवा कारवाईबाबत चर्चा केली नाही.
मराठी समजता नही म्हणताच झाला गोंधळ
बैठकीत ठेकेदार कंपनी नेमके काय करणार, अशी विचारणा झाल्यावर यावेळी मेघा इंजिनिअरिंगच्या प्रतिनिधीने मराठी समजत नसल्याचे सांगताच, एकच गोंधळ उडाला. मजूर पळून गेले, पुसेगावकडे मशिनरी पाठवली, असे ते सांगत होते, मात्र नागरिक ऐकण्यास तयार नव्हते. अखेरीस सौ. नलावडे यांनी हस्तक्षेप करुन, त्यांचे म्हणणे समजून घ्या, असे सांगितले. त्यानंतर त्यांना विषय समजावा म्हणून, पदाधिकारी व कार्यकत्यांनी हिंदीतून तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. चुकीचे काम करणार्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करताच, बारावकर यांनी आम्ही नियमानुसार काम करत असून, कामास उशिर होत असल्याबद्दल आणि नियमानुसार काम होत नसल्याने संबंधितांना नोटीसा बजावल्या असल्याचे सांगितले. त्याचबरोबर दंडाची आकारणी केली असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने अनेकांनी बारावकरांनाच लक्ष्य केले. नायब तहसीलदार अमर रसाळ यांनी यापूर्वीच ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना सूचना दिल्या असल्याची जाणीव करुन दिली, मात्र प्रतिनिधी केवळ एकमेकाच्या तोंडाकडे पाहत होते.
रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यावर प्रश्नांची सरबती
RELATED ARTICLES