परळी ः सातार्यात उन्हाचा पारा तब्बल 40 अंशावर पोहचला. त्यामुळे नागरिक उकाडयाने चांगलेच हैराण झाले. तसेच वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. तज्ञांच्या मते आणखी दिवस तरी तापमानाचा पारा सरासरी 38 अंशाच्या आसपास राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्यक आहे.
आठवडाभरापासून सूर्यनारायण आग ओकायला लागले आहेत. उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी मिळेल त्या वस्तूंचा आधार घ्यावा लागत आहे. सर्वसाधारणपणे मे महिन्यातील उन्हाळा असह्य असतो. मात्र, परिसरातील डोंगरी प्रदेश, वनसंपदा असल्याने गार झुळूक येत असते. त्यामुळे कडक उन्हातही फारसा फरक पडत नाही. यंदा मात्र, एप्रिल महिन्यापासून उन्हाचा पायाने उसळी मारली आहे. कडक उन्हामुळे सावलीत बसले तरी उन्हाच्या झळा बसत आहेत. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयांमध्ये वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे त्रासलेल्या जीवाला शांत करण्यासाठी शहरातील रसवंतीगृह, आईक्रिम पार्लरमध्ये गर्दी होऊ लागली आहे. तसेच माठातील पाणी, फ्रीजमधील पाण्याचा वापर केला जात आहे.