पाटण:- कोयना सिंचन मंडळाने जाहीर केलेले प्रकटन मागे घ्यावे. पाणी परवाना कार्यालय पूर्ववत पुन्हा पाटणला सुरू करावे. अन्यथा येत्या आठ दिवसात कोयना सिंचन कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करावे लागेल, असा गर्भित इशारा शेतकऱ्यांच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी कोयना सिंचन मंडळ कार्यालयास निवेदनाद्वारे दिला.
या निवेदनात पुढे म्हटले आहे. कोयनानगर (ता. पाटण) येथील कोयना धरण व्यवस्थापन कार्यालयाकडे कोयना सिंचन मंडळाचा कार्यभार वर्ग करण्यात आला आहे. मात्र कोयना धरण व्यवस्थापन कार्यालयास वा सिंचन मंडळाचे अधिकार, कामकाज याविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे पाटण तालुक्यातील शेतकऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोयना सिंचन मंडळाने 25 ऑगस्ट 2017 रोजी जाहीर प्रकटन क्रमांक एक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये कोयना नदीवरील उपसा जलसिंचन योजना तसेच वांग मराठवाडी, उत्तरमांड चाफळ, महिंद, चाळकेवाडी, चिरेधर या लघुपाटबंधारे प्रकल्पातील लाभक्षेत्रातील शेतकऱयांनी आपले पाणी परवाने सप्टेंबर 2017 पर्यंत नुतनीकरण करावेत असे जाहीर प्रकटन कार्यालयाने केले आहे. मात्र याबाबत सहकारी पाणी पुरवठा संस्था तसेच पाणी परवानाधारक शेतकरी अनभिज्ञ होते. संबंधित शेतकरी कोयनाकर भरतात, मग शेतकऱयांना आर्थिक भुर्दंड का? त्यासाठी पाटण, कोयना, सातारा, सांगली असे हेलपाटे शेतकऱयांना मारावे लागत आहे. संबंधित लघुपाटबंधारे अपुर्णावस्थेत आहेत. एकाही प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण नाही. आणि संबंधित प्रकल्पातून पाण्याचे नियोजन कोयना मंडळ कार्यालय कशाच्या आधारावर करत आहे. या पाण्याचे नेमके नियोजन कोणी करावे, शेतकऱयाच्या वाटपाचे हक्काचे पाणी किती, कोयना सिंचन मंडळाचा कार्यभार कोयना धरण व्यवस्थापन कार्यालयाकडे वर्ग केला असून या शासन निर्णयाची माहिती दिली आहे का? तसेच हा निर्णय गुपचुपपणे का घेण्यात आला आहे. यामध्ये नेमके कोणाचे हित साधले जाणार आहे. यात काय गौडबंगाल आहे. अशा प्रश्नांची सरबत्ती करुन कोयना सिंचन मंडळाचा गलथान कारभाराचा जाब विक्रमबाबा पाटणकर यांनी विचारला.
कोयना धरण व्यवस्थापन व सिंचन मंडळाचे अभियंता सरवडेकर यांनी यावेळी शेतकऱयांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. व शेतकऱयांच्या भावना कार्यकारी अभियंत्यांना तातडीने कळविण्याचे आश्ववासन दिले. यावेळी निवेदन देताना चिटेघर, बिबी, निवकणे व पाटण येथील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न झाल्यास कोयना सिंचन कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करावे लागेल – विक्रमबाबा पाटणकर.
RELATED ARTICLES