महाबळेश्वर : एकीकडे संपूर्ण देश कोरोना विरुद्धच्या लढाईत व्यस्त असताना दुसरीकडे मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मात्र अनधिकृत बांधकामांना उधाण आलेले पहायला मिळत आहे. जंगल परिसरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेले धनिकांचे इमले हे अक्षरश: निसर्गाच्या मुळावरती उठलेले आहेत.त्यामुळे विविध प्रकारच्या वनौषधींनी सुसज्ज असलेल्या महाबळेश्वर च्या वनराईचीे विनाशाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.हे सर्व असेच चालत राहिल्यास येणाऱ्या काळामध्ये नैसर्गिक जंगला ऐवजी सिमेंट काँक्रीटची कृत्रिम जंगले तयार व्हायला वेळ लागणार नाही.
सर्वदूर पसरलेली वनराई ही खऱ्या अर्थाने महाबळेश्वरच्या आल्हाददायक वातावरणाचा आत्मा आहे.विशेषतः महाबळेश्वरच्या पश्चिमेकडील भागामध्ये जंगलाचे प्रमाण अधिक असल्याने शासनाने हा भाग वनसदृश्य म्हणून जरी घोषित केला असला तरी देखील या भागातील मेटतळे गावच्या हद्दीमध्ये सध्या सर्वे क्रं.३/६ मध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनना सोबत अनधिकृत बांधकाम राजरोसपणे सुरू असलेच दिसत आहे.
एकीकडे संपूर्ण देश कोरोना विरोधची लढाई लढत असताना नेमक्या याच संधीचा फायदा घेत सदर धनिकाने घनदाट जंगल परिसरामध्ये हा उपद्व्याप सुरू केला आहे. सदर बांधकामा विरोधात दिवाणी दावा दाखल असताना देखील बेधडकपणे चाललेले हे काम पाहता शासनाचे नियम हे फक्त सर्व सामान्य जनतेसाठीच आहेत का? धनदांडग्यानी या नियमाला कोलदांडा दिला तरी चालतो का? असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहत आहेत.
महाबळेश्वर शहरा पासून अवघ्या पाच कि.मी अंतरावरती असलेल्या व मुख्य रस्त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती चालू असलेला हा प्रकार मात्र स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही याला आश्चर्यच मानावे लागेल. स्थानिक प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पर्यावरण प्रेमीमध्ये मात्र संतापाची लाट निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे अश्या बेदरक प्रवृतींना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्य काळामध्ये , एक होते महाबळेश्वर, एक होते प्रदूषण मुक्त शहर, एक हिते थंड हवेचे ठिकाण, एक होते महाराष्ट्राचे नंदनवन असेच म्हणायची वेळ येणार हे मात्र नक्की.
लॉक डाऊनमध्ये महाबळेश्वर परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांना उधाण
RELATED ARTICLES