
रहिमतपूर : रहिमतपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्या ट्रॉफिक आयलँडच्या आरक्षित जागेचा तहसिलदार स्मिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने प्रत्यक्ष जागेचा ताबा घेतला. दरम्यान जेसीबीच्या साह्याने व्यावसायिकांची दुकाने व घरे पाडण्यात आली.
गेली कित्येक वर्षे चर्चेत असणार्या गांधी चौकातील आरक्षित ट्राफिक आयलॅण्डची जागा खाली करण्यास व्यावसायिकांच्या विनंतीवरुन प्रशासनाने मानवतावादी दृष्टीकोनातून दि. 29 डिसेंबर 2017 रोजी एक आठवड्याची मुदत व्यावसायिकांना देण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवार, दि. 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जागेचा ताबा घेण्यासाठी तहसिलदार, नगरभूमापन, पालिका प्रशासन, रहिमतपूर पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली.
कारवाई दरम्यान सर्व मिळकत धारकांचे पंचनामे करण्यात आले. सातारा सहाय्यक नगररचनाकार दिलीप कुलकर्णी, आंनद कांबळे, रहिमतपूर नगरभूमापनचे भूमापक गणेश कुंभार, पोलीस पाटील दिपक नाईक, तलाठी पी.जी. सदावर्ते, ए.एल.घोरपडे, आर.एम.घोरपडे, महेश पाटील, एस.यी.शिंदे, मोनाली चव्हाण, मंडलाधिकारी एम.जी.पाटोळे, पालिका कर्मचार्यांनी भाग घेतला. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, नगरसेवक विद्याधर बाजारे, शशीकांत भोसले,सर्व व्यावासायिक उपस्थित होते. रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस.जे.माने, पोलीस नाईक पी.सी.गायकवाड यासह महिला पोलीस शिपाई जाधव, घाडगे या कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.