Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीवनाधिकार्‍याच्या मुलालाच वृक्षारोपणाचा ठेका; आ. गोरे यांचा खळबळजनक आरोप, पालमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

वनाधिकार्‍याच्या मुलालाच वृक्षारोपणाचा ठेका; आ. गोरे यांचा खळबळजनक आरोप, पालमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

सातारा : माण तालुक्यातील पळशी, पाचवड, बिदाल या गावांमधील वृक्षारोपणाचा ठेका वन अधिकारी संजय चव्हाण यांनी त्यांचा मुलगा हर्षद संजय चव्हाण याच्या कंपनी फर्म नावाने घेतला. वृक्षारोपण करताना मापदंडानुसार खड्डे घेतले नाही. वृक्षारोपणावेळी खड्ड्यात काळी माती न भरणे, झाडांना खत न घालता या कामाची बिले काढली. या कामात वन अधिकार्‍याने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आ. जयकुमार गोरे यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली. आ. गोरेंच्या आरोपाची स्वतंत्र चौकशी आणि जिल्ह्यात झालेल्या वृक्षारोपणाची त्रयस्थ यंत्रणेद्वारे चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी दिले. दरम्यान, या प्रकारामुळे वन विभागातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली असून संपूर्ण जिल्ह्यातील वृक्षारोपणच संशयाच्या भोवर्‍यात आले आहे.
जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक नियोजन भवनात ना. विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी पार पडली. बैठकीस जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, जिल्हा उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा प्रमुख उपस्थित होते.
माण तालुक्यात वन विभाग तसेच सामजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षरोपण कामाचा पंचनामा आमदार तसेच नियोजन समिती सदस्यांनी बैठकीत केला. आ. जयकुमार गोरे म्हणाले, वन विभागाने वृक्षारोपणावर केलेल्या खर्चाची माहिती मिळत नाही. अधिकार्‍यांचं काय चाललंय कळत नाही. त्यांनी केलेल्या कामाचा कधी आढावा घेतलाय का? माण तालुक्यातील पळशीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या गावात 15 हजार 625 खड्डे काढण्यात आले. त्याचे 8 लाख 16 हजाराचे बिल काढण्यात आले. काम करणार्‍या ठेकेदाराला काम केलेल्या बिलाचे 2 लाख दिले जात असतील तर वरचे पैसे कोण घेतो? खड्ड्यात खत घातले जात नाही. 120 ट्रॉली खत घालणे अपेक्षित असताना 14 ट्रॉल्यापेक्षा जादा खत घातले नाही. झाडे लावण्यापूर्वी त्या खड्ड्यात 1 हजार ट्राली काळी माती भरणे अपेक्षित असताना फक्त 125 ट्रॉली माती वापरण्यात आली. ठेका कुणाच्या नावावर? काम कोण करतोय? बिले कुणाच्या नावावर काढली जातायत? कुणाचा कशाला ताळमेळ नाही. पाचवड गावातही अशीच परिस्थिती आहे. माती तसेच खताची चौकशी झाली पाहिजे.
वन अधिकार्‍यांनी डायरेक्ट स्वत:च्या कंपन्यांच्या फर्मच्या नावे कामे घेतली आहेत. अधिकारी संजय चव्हाण यांचा मुलगा हर्षद संजय चव्हाण यांच्या नावाने संबंधित गावातील वृक्षारोपणाचा ठेका घेण्यात आला आहे. खड्डे संख्या, खड्ड्यांची खोली व रुंदी, माती, खते, झाडे किती लावली, खर्च किती झाला याची माहिती घ्या. संबंधित अधिकारी कामाच्या मोजमापाची माहिती देत नाहीत. वन विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा सनसनाटी आरोप आ. जयकुमार गोरे यांनी केला. जिल्ह्यात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. अधिकारीच ठेकेदार बनून कामे घेत आहेत. ठेकेदार, मध्यस्थ आणि अधिकार्‍यांचे देण्याघेण्यावरुन एक प्रकरण दहिवडी पोलिस ठाण्यापर्यंत गेले. चर काढण्याच्या कामांना 10 रुपये प्रति चौफूट खर्च येत नाही पण त्याची बिले 22 रुपये प्रति चौफूूटने काढली जातात. या कामाच्या मोजमापाची माहिती दिली जात नाही. माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. वन विभागाचे अधिकारीच जर वृक्षारोपणाचे ठेके घेत असतील तर त्या कामाची चौकशी झाली पाहिजे. तीन गावांमध्ये केलेल्या वृक्षारोपणात घोटाळा झाला असून हा प्रकार खूपच खतरनाक असल्याचेही आ. गोरे यांनी सांगितले.
ना. विजय शिवतारे यांनी उपवनसंरक्षक हाडा यांच्याकडे विचारणा केली. हा प्रकार प्रचंड गंभीर आहे. आ. गोरे यांनी केलेल्या तक्रारीची स्वतंत्र चौकशी करावी. तसेच जिल्ह्यात झालेल्या वृक्षारोपणाच्या त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्याचे आदेश ना. शिवतारे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. ही चौकशी करावी लागणार असल्याने संबंधित वन अधिकारी संजय चव्हाण यांचा त्याठिकाणचा चार्ज काढून घ्यावा आणि त्याठिकाणी चौकशीसाठी सक्षम अधिकार्‍याची नियुक्ती करा, असे आदेशही ना. शिवतारे यांनी दिले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular