सातारा: पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांनी समाजात घडणार्या सकारात्मक घटनांवर आधारित पत्रकारिता करावी व विकसीत समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज केले.
सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन आज प्रशासकीय इमारतीतील बळीराजा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक संदीप पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील होते. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच विविध पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हरिष पाटणे,विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर, शरद काटकर, तुषार तपासे, राहूल तपासे, ओंकार कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सध्या प्रसार माध्यमातील नकारात्मक बातम्यांबाबत समाजामध्ये नाराजी दिसून येत आहे, त्यामुळे पत्रकारांनी समाजात घडणार्या सकारात्मक सत्यबाजू मांडल्या पाहिजेत. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. सध्याचा पत्रकार हा मोठ्या दडपणाखाली काम करत आहे. पत्रकारांनी आपले चारित्र्य नेहमीच चांगले ठेवले पाहिजे. तुमच्या चांगल्या चारित्र्याच्या जोरावर तुम्ही कोणत्याही अडचणी मात करु शकता.जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग चांगले काम असून त्यांच्या चांगल्या कामांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी शेवटी केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. पाटील मत व्यक्त करताना म्हणाले, तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मिडीयाच्या अनिर्बंध वापरामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपुढे सुध्दा एक नवीनच आव्हान उभे राहिले आहे. आज उत्तम कौशल्यपूर्ण मनुष्य बळ भारताकडे असल्यामुळे जगाच्या नजरा भारताकडे वळल्या आहेत. माध्यमाचे सर्वात मोठे मार्केट भारतात आहे. भारतात रोज 10 कोटी वर्तमानपत्र विकली जातात. भारतातील फेसबुक युजर्स आज घडीला 20 कोटी आहेत. आता रोज 7 लाख नवीन युजर्स भारतात वाढत आहेत. वॉटस्अप वापरणार्यांची संख्याही या पेक्षाही अधिक आहे. युट्यूब, इंस्टाग्राम, ट्वीटर वापरणार्यांची जगातील सर्वाधिक संख्या भारतातील आहे, सोशल मीडियामध्ये आर्थिक उत्पन्न तयार करण्याची ताकत कमालीची असल्यामुळे, वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्सनी या माध्यमाशी जूळवून घेऊन त्यांची भाषा वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काळाशी सुसंगत राहून माध्यम हे आव्हान न समजता नवा वर्ग ग्राहक म्हणून जोडून घेत ही संधी म्हणून पाहत आहेत. त्यामुळे आता जिल्हास्तरावरील पत्रकारांनी सोशल मीडियात अधिक पारंगत व्हावे. पत्रकारिता ही लोक शिक्षणाचे माध्यम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी केली. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शंकराराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीसह सर्व योजनांची माहिती यावेळी दिली. सध्या विविध समाज माध्यमांचे आव्हान वृत्तपत्रांसमोर आहे. त्यानुसार प्रिंट मीडियानेही आत बदल करण्यास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्याचे वातारण इतर जिल्ह्यांपेक्षा चांगले आहे. पोलीस विभागास व जिल्हा प्रशासनाच्या चांगल्या कामांना पत्रकारांचे सहकार्य राहील, असे आश्वासन हरीष पाटणे यांनी यावेळी दिले. आज समाजाला सकारात्मक पत्रकारितेची गरज आहे. पत्रकारांनी समाजात झालेल्या चांगल्या कामांना प्रसिद्धी द्यावी त्यामुळे इतर लोकांनाही चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळले आणखीन लोक पुढे येवून चांगले काम करीत, असा विश्वास यावेळी तुषार तपासे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी सर्व पत्रकार व प्रसार माध्यमांनी एकमेकात समन्वय ठेवून काम केल्यास चांगली पत्रकारिता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी गतवर्षी उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार मिळालेले दैनिक ग्रामोद्धारचे उपसंपाद एकनाथ थोरात, दैनिक लोकमतचे सागर गुजर, दैनिक पुढारीचे हरीष पाटणे, प्रविण शिंगटे, दैनिक सकाळचे श्रीकांत कात्रे यांचा शाल, पुष्पगुच्छ वस्मृतीचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक ग्रामोद्धारच्या वतीने उपस्थित पत्रकारांना पेनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक दिक्षीत यांनी केले तर सर्वांचे आभार विठ्ठल हेंद्रे यांनी मानले. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.