पाटण:- शिवाजी गुणाजी पवार वय- ५५ रा. काठी ता. पाटण या शेतकऱ्याने मुलाचा कडकनाथ कोंबडी व्यवसाय घोटाळ्यात गेल्याच्या कारणावरुन पुणे येथे मुलाच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा जालिंदर शिवाजी पवार याने भागीदारीत सुमारे आठ लाख रुपयेचे कर्ज काढून व ते गुंतवणूक करून चार महिन्यापूर्वी काठी येथे महारयत अँग्रो कंपनी कडून कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरु केला होता. चार महिन्यातच महारयत अँग्रो कंपनीच्या संचालकांनी कंपनीत कोठ्यावधीचा घोटाळा करून पोबारा केल्याने गुंतवणूक शेतकरी गोत्यात आले. हा धक्का सहन न झालेले शेतकरी शिवाजी गुणाजी पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्या ची खबर जालिंदर शिवाजी पवार याने कोथरूड (पुणे) पोलिस स्टेशनलाया दिली आहे. कडकनाथ प्रकरणी पाटण तालुक्यातील गेलेल्या दुसऱ्या बळीने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी शिवाजी गुणाजी पवार वय- ५५ रा. काठी ता. पाटण हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्यांचा मुलगा जालिंदर शिवाजी पवार हा कामानिमित्त कोथरूड (पुणे) येथे राहत होता. त्याला जादा फायद्याचा कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाय बाबत सोशल मीडिया आणि यु ट्युब वरुन समजले असता त्याने गावातीलच मित्र योगेश रमेश कदम याला बरोबर घेऊन इस्लामपूर येथील महारयत अँग्रो च्या कार्यालयात भेट दिली. तिथे कडकनाथ व्यवसायात कमी गुंतवणूकीत जादा फायदा मिळत असल्याचे अमिश दाखवले. या अमिशाल बळी पडून जालिंदर पवार व योगेश कदम यांनी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय गावी करायचे ठरवले. व त्या द्रुष्टीने त्यांनी कर्ज काढून कडकनाथ कोंबडीची चार युनिट इस्लामपूर कार्यालयात पैसे देऊन खरेदी केली. यावेळी कार्यालयात महारयत अँग्रो चे संचालक सुधीर शंकर मोहिते, संदिप सुभाष मोहिते व सागर सदाशिव खोत हे उपस्थित होते असे सांगितले.
कडकनाथ साठीचे खाद्य, औषध खर्च, शेड व निवारा यासाठी सुमारे आठ लाखाहून अधिक पैसे खर्च झाले. प्रोजेक्ट युनिट सुरू अवघे चार महिने झाले. आणि सदर प्रकरण फसवे निघाले. यात पवार आणि कदम कुटूंबिय हतबल झाले. राज्यभरातच कडकनाथ पालक शेतकरी फसले गेले आणि यातील पैसे परत मिळणार नाहीत. या विचाराने मुलांची चाललेली हतबलता पाहून शिवाजी गुणाजी पवार यांना मानसिक धक्का बसला. या मानसिक विचाराने कष्टकरून सुखासमाधानाने जगणारा सर्वसामान्य शेतकरी बळीराजा शिवाजी गुणाजी पवार यांनी ९ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजता पुणे येथे मुलाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कडकनाथ पालक शेतकरी फसवणुक प्रकरणातील यांचा दुसरा बळी ठरला. या प्रकरणी जालिंदर शिवाजी पवार यांनी कोथरूड (पुणे) पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. यापूर्वी मागील आठवड्यात पाटण येथील कडकनाथ प्रकरणात फसलेले अनिल आर्डे यांचे वडील खाशाबा आर्डे यांचा कडकनाथ प्रकरणाच्या धक्क्याने मृत्यु झाला.