वडूज (धनंजय क्षीरसागर) : खटाव तालुक्यातील सहा गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. बहुतेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्याचे निकालावरुन सिध्द होत आहे. या निकालाकडे पक्षीय पातळीवर पाहिले असता सर्वच प्रमुख पक्षांना कही खुशी कही गम चा अनुभव घ्यावा लागल्याचे चित्र आहे. औंध व डिस्कळ येथे सरपंचपदाची निवडणूक खुपच घासून पुसून झाली. या ठिकाणी असणार्या तिसर्या अपक्ष उमेदवाराचा नक्की कोणास फायदा झाला व कोणास तोटा झाला याचीच चर्चा त्या त्या परीसरात सुरु आहे.
औंध येथे अनेक वर्षे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे व त्यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या घराण्याचे ग्रामपंचायतीवर पारंपारिक वर्चस्व आहे. मागच्या खेपेस सर्वच विरोधकांना गोडीगुलाबीने चुचकारत गायत्रीदेवींनी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडली होती. मात्र निवडणूकीनंतर त्यांच्या बगलबच्यांनी सोयीचे रागरंग आळवल्याने सरपंच पदाची निवडणूक झाल्यापासून आत्तापर्यंत विरोधकांना हात हालवत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच मागील सहा महिन्यापूर्वी पाणीटंचाई व पाणी योजनेचे निकृष्ट काम हा कळीचा मुद्दा घेवून सर्वपक्षीय विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या मुद्यावरुन सर्वांनी एकत्र येत उपोषणही केले होते. त्या उपोषणास ग्रामस्थांसह तालुक्यातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून पाठींबा दिल्याने त्यावेळेसच विरोधी जगदंबा आघाडीच्या शिडात चांगलीच हवा भरली होती. त्यामुळे निवडणूक रंगतदार व चुरशिची होणार हे जाणकारांच्या लक्षात आले होते. झालेही तसेच निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सोनाली मिठारे यांनी अवघ्या 76 मतांनी निसटता विजय मिळविला. त्यांना जगदंबा आघाडीच्या भाग्यरेखा गोसावी यांनी कडवी झुंज दिली. तर अपक्ष उमेदवार शैला यादव यांनी 346 मते घेवून आपले जनमत एकाकी आजमावले. सरपंच पदासह आठ जागा जिंकून राष्ट्रवादी पॅनेलने आपली सत्ता अबाधित राखली आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या अनुपस्थितीत निवडक मावळ्यांना हाताशी धरत कु. चारुशिलाराजे यांनी पांरंपारिक विरोधकांवर मात केली. निवडणूकीच्या निमित्ताने त्यांचे नवनेतृत्व समाजासमोर आले आहे. दुसर्या बाजूला वसंतराव गोसावी, राजाभाऊ देशमुख, मेजर आमले, चंद्रकांत पवार, आलिमभाई मुल्ला यांनी राजघराण्याचा निर्णायक पाडाव करण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले. गायत्रीदेवींचे एकदातरी पाणीपत व्हावे अशी विरोधकांसह त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेतेमंडळींची इच्छा आकांक्षा होती. मात्र विरोधी आघाडीस युवा नेते शेखरभाऊ गोरे यांच्या व्यतिरीक्त कोणीही थेट रसद पुरविण्याचे धारिष्ट व दातृत्व दाखविले नाही.
पडळ येथे गेल्या वेळेस तहात हारलेल्या बाजार समितीचे विद्यमान सभापती रविंद्र सानप व गुदगे गटाच्या कार्यकत्यांनी या खेपेस जनमतातून आपले वर्चस्व सिध्द करण्याचा विडा उचलला होता. त्याकरीता मागील पाच वर्षे शांत राहिलेल्या माजी सरपंच पै. चंद्रकांत सानप यांना या खेपेस किस्ताक घालण्यात आले होते. मात्र विद्यमान सरपंच अजय सानप, तळमळीचे कार्यकर्ते प्रकाश हांगे व त्यांच्या चिवट सहकार्यांनी पैलवान व वस्ताजास मान वर करुन दिली नाही. नाही म्हणायला या दोघांना बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत पाटील यांचे पासांग फायदेशीर ठरल्याची चर्चा आहे. येथील निकालाने माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर व भाजपा समर्थकांना अद्यापही कलेढोण गणात अच्छे दिन असल्याची जाणीव करुन दिली आहे.
येलमरवाडी येथील निवडणूकीत प्रसाद बागल व शरद बागल या शिष्यांनी गुरुची विद्या गुरुला परत करत गावावरील आपली पकड कायम राखली आहे. यापैकी शरद मिस्त्री हे हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जातात. तर सामाजिक कामात झोकून दिलेल्या प्रसाद सरांचा वावर आ. जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. येळगांवकर, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख या ठिकाणच्या दरबारात असतो. त्यामुळे निवडणूकीचा प्रसाद कोणाच्या पारड्यात पडणार हे आगामी काळात होणार्या सार्वत्रिक निवडणूकीतच ठरेल. तिच तर्हा पळसगांवच्या सतिश घाडगे-पाटील यांची आहे. आत्तापर्यंत घाडगे पाटलांनी गुदगे, येळगांवकर, निमसोडकर देशमुख, पंचायत समिती निवडणूकीत मोरे असा चौफेर प्रवास केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची विजयी टिम सांगा कोणाची असा प्रश्न पडला आहे. डिस्कळ येथे राष्ट्रवादीच्या डॉ. महेश पवार यांनी सरपंच पदी निवडून येवून पक्षाची सत्ता कायम राखली आहे. त्या ठिकाणी विरोधी उमेदवार सागर मदने यांचा केवळ 10 मताने पराभव झाला. सागर हे माजी उपसभापती लहुकुमार मदने यांचे सुपुत्र आहेत. काँग्रेस बरोबर भाप, शिवसेना व इतर छोट्या-मोठ्या घटकांची मदत घेवून मदने सरांनी प्रस्थापितांना चांगली टक्कर दिली. या ठिकाणी आ. शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व माणणार्या पॅनेलने सरपंच पदासह सहा जागा जिंकल्या आहेत. विरोधी आघाडीने सरपंच पदास जोरदार टक्कर देण्याबरोबर चार जागेवरही यश मिळविले आहे. आज मितीला मदने सर राष्ट्रीय काँग्रेसचे पाईक असले तरी उद्या भविष्यात गारवडीकर शिवाजीराजें च्या सल्याने त्यांनी खटावच्या महेश गडाकडे कूच केल्यास राजकीय जानकारांना आश्चर्य वाटणार नाही. या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अॅड. मेघराज निकम यांनी आपले बंधू अमोल निकम यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यांना 410 मते मिळाली. या निमित्ताने अॅड. निकम यांनी स्वत:ची शक्ती आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फटका अॅड. पवार यांची मराठी मते फोडण्यात झाला की विरोधी आघाडीचे बळ कमी झाले हा संशोधनाचा विषय आहे.
डिस्कळ येथील दिलेली कडवी झुंज त्याचबरोबर कोरेगांव तालुक्यातील एकसळ, चंचळी, आझादपूर, भाडळे, या चार ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता आली आहे. खटाव ग्रामपंचायतीत परिवर्तन घडल्यानंतर कोरेगांव तालुक्यातही भाजपाला मोठे यश मिळत आहे. त्यामुळे आ. शशिकांत शिंदेंना युवा नेते महेश शिंदेंचा चांगला पर्याय समोर आला आहे. अशी आशा त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.
राजकीय पक्षांना कही खुशी कही गम : अपक्षाचा फायदा तोटा कोणाला ?
RELATED ARTICLES