सातारा : ऐतिहासिक सातारा शहराची तहान भागविणा-या कास धरण प्रकल्पाचे काम खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने पूर्णत्वाकडे झेपावत आहे. शहाराच्या विकासासंबधीची महत्वकांक्षा आणि दूरदृष्टी खासदारांकडे असल्याने शहराचे सौदर्य निश्चितपणे आणखी खूलणार असून लवकरच कास प्रकल्पपूर्तीचा सोहळा ‘याची देही याची डोळा’ सातारकरांना पहावयास मिळणार आहे, असा विश्वास सातारा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला.
श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी कास प्रकल्पाला भेट दिली. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, ॲड. डी.जी. बनकर, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, मुख्याधिकारी शंकर गोरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पांटबंधारे विभागाचे अधिकारी हेही खा. उदयनराजे यांच्यासमवेत होते. खासदार यांनी यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा करून कास प्रकल्पाचा एकूण आढावा घेतला आणि सूचनाही केल्या. या पार्श्वभूमीवर कास प्रकल्पाची सद्यस्थिती सातारकरांना ज्ञात व्हावी या हेतुने हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पत्रकात पुढे असे नमूद केले आहे की, या प्रकल्पामुळे पाणीसाठवण क्षमता साधारणपणे पाच पटीने वाढणार आहे. म्हणजेच ५०० दशलक्ष घनफूट इतका जलसाठा होईल. धरणाची लांबीही वाढविण्यात येत असून जवळपास ती ५८० मीटर इतकी असून उंचीही वाढविली आहे. आता या प्रकल्पाने अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून कमालीचा वेग पकडला आहे. ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत हा प्रकल्प येऊन ठेपलाय. कोणत्याही कारणाने प्रकल्पाचा वेग कमी होणार नाही यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले स्वतः लक्ष देत आहेत.
सद्या मुख्य सांडवा येथील काम करावयाचे आहे. यासाठी कृती आराखडा तयार करून दोन दिवस प्रायोगिक तत्वावर पाणीपुरवठा कार्यान्वित करावा लागणार आहे. म्हणजे पाणी लिप्ट करण्यासाठी किती हॉर्स पॉवरचे पंप उपलब्ध करावे लागतील त्याचबरोबर जनरेटरचीही आवश्यकता किती आहे या सर्व गोष्टींचा अंदाज येईल. हा अंदाज आल्यानंतर सांडव्याचे काम हाती घ्यावे. नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही यासाठी दक्ष रहावे, अशा सक्त सूचना खा. श्री.छ.उदयनराजे यांनी दिल्या आहेत असे सांगून राजेशिर्के यांनी पुढे म्हटले आहे की, सांडव्यावरील काम अवघड आहे. अशावेळी पर्यायी यंत्रसामुग्री उपलब्धही ठेवून शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यातूनही अनपेक्षितरित्या काहीवेळासाठी पाणीपुरवठा खंडित झालाच तर सातारकरांनी सहकार्य करावे. शहराला कायम स्वरूपी मुबलक पाणी मिळावे यासाठी हा महत्वपूर्ण महात्वकांक्षी प्रकल्प खा. उदयनराजे यांनी हाती घेतला असून हा प्रकल्प शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचाच आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.
थोरले छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी कास धरणातून सातारा शहराला पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल यासाठी विशेष प्रयत्न केलेत. कास धरणातून उघड्या पाटाद्वारे येवतेश्वर डबी व तेथून खापरीलाईन द्वारा शहरात पाणी आणले. त्याकाळी थोरल्या प्रतापसिंह महाराजांच्या दूरदृष्टीला शहाराने दाद देऊन सहकार्य केलं. अगदी त्याच पध्दतीने श्री.छ. खा. उदयनराजे यांना दाद देऊन महात्वकांक्षी कास प्रकल्प साकारण्याच्या कार्याला राजकीय सर्व मतभेद बाजूला सारून सदिच्छा देणं, आपलं कर्तव्य आहे, असेही उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सदर पत्रकात शेवटी स्पष्ट केले आहे.