वडूज: माढा लोकसभा निवडणूकीच्या प्रचारास गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजयमामा शिंदे व महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पहिल्या टप्यात साखर कारखान्याच्या यंत्रणेमार्फत गावपातळीवरील कार्यकत्यांची चाचपणी सुरु केली आहे. खटाव-माण या दोन्ही तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींनी हळूहळू आपल्या भूमिका स्पष्ट करावयास सुरुवात केली आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना प्रत्येकाने आपल्या गटाची स्वतंत्र बैठक घेत कार्यकत्यांची ताकद उमेदवारांना दाखवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकसभेच्या निमित्ताने संबंधितांनी आपल्या कार्यकत्यांची पटपडताळणी केली असली तरी प्रत्येकाचा विधानसभा निवडणूक हाच उद्देश असल्याचे राजकीय जाणकारांच्या नजरेतून सुटत नाही.
कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख स्वत: निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यादृष्टीने त्यांनी गेले दोन महिने सलगपणे कार्यक्रमावर भर दिला होता. वाघमोडेवाडी येथे दादा मडकेंच्या सहकार्याने केलेला वॉटरकप स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव समारंभ, श्री. देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लोधवडे, बिजवडी, दहिवडी या ठिकाणी गर्दी झाली होती. मागील आठवड्यात त्यांची उमेदवारी अचानक डावलली. तरीही त्यांनी स्वत:चे खच्चीकरण करुन न घेता पक्षसंघटनेसाठी वेळ देणे सुरुच ठेवले आहे. त्यांना मार्डीचे पोळ बंधू, पंचायत समिती सभापती रमेश पाटोळे, म्हसवडचे युवराज सुर्यवंशी, प्रा. कविता म्हेत्रे, दहिवडीचे सुनिल पोळ व पक्षाच्या अन्य निष्ठेवंतांचे बळ मिळत आहे. देशमुख साहेबांनी केलेली ही तयारी व्यर्थ जाणार की उद्या विधानसभा निवडणूकीत नाट्यमय घडामोडी घडल्या व इंदापूर, माण मतदारसंघाची आदलाबदल झाली तर उपयोग होणार याकरीता काही काळ वाट पहावी लागणार आहे.
आ. जयकुमार गोरे यांनीही निवडणूकीसंदर्भात म्हसवड येथील कै. दोशी सभागृहात मेळावा घेण्याबरोबरच वडूज, दहिवडी येथे चाचपणी, बैठकी त्याचबरोब बोराटवाडी फार्महाऊसवर निवडक कार्यकत्यांसमवत चर्चा, बैठकांचा सपाटा लावला आहे. आजमितीला ते काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र ते आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात अद्याप सक्रीय झाले नाहीत. म्हसवड येथील सभेत त्यांनी कसली आघाडी अनं कसला धर्म असा प्रश्न करत पाणी बघून उडी घ्या असा सूचक सल्ला कार्यकत्यांना दिला आहे.
शेखरभाऊ गोरे यांनी दहिवडी येथील बालाजी मंगल कार्यालयात तरुणाईची गर्दी जमवली होती. या गर्दीत अनेक कार्यकत्यांनी राष्ट्रवादीकडून झालेल्या अन्यायाविरोधात जोरदार आवाज उठवत भूमिका बदलण्याची मागणी केली. त्यानंतर शेखरभाऊंनी सातारा येथे पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणूकीत भाजपाचे काम करण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षप्रवेशाबाबत ज्या त्या वेळी निर्णय घेणार असल्याचे सांगून आपले सर्वच पत्ते अद्याप खुले केले नाहीत. त्यांच्या पत्रकार परिषदेस उपसभापती नितीन राजगे, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर व कविता जगदाळे या महिला सदस्याची उपस्थिती होती.
विधानपरिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी वडूज येथील पंचरत्न मंगल कार्यालयात कार्यकत्यांचा मेळावा घेवून संजयमामांना आपली ताकद दाखवून दिली आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. घार्गे यांचेसह माजी सभापती संदिप मांडवे, सुरेंद्रदादा गुदगे, प्रा. बंडा गोडसे, नंदकुमार मोरे, कल्पना मोरे यांनी जोरदार भाषणबाजी करत शिंदेमामांना मताधिक्य देण्यासंदर्भात भिमगर्जना केली. सद्या ही सर्व मंडळी उमेदवाराबरोबर जावून गावोगावी कार्यकत्यांच्या गाठी-भेठी घेण्याबरोबर बैठका, कोपरा सभा करत आहेत.
भाजपाचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांनी तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा व अन्य पदाधिकार्यांच्या सहकार्याने मनिष चित्र मंदिरात कार्यकत्यांचा मेळावा घेवून आपली ताकद दाखवून दिली. यावेळी डॉ. येळगांवकर यांनी मतदारसंघातून 1 लाखाचे मताधिक्य देण्याची घोषणा करण्याबरोबर स्वत: उमेदवारीचे दावेदार असल्याचे सांगून टाकले. त्या दिवशी पक्षाचे दुसरे इच्छुक अनिलभाऊ देसाई यांनीही दहिवडीच्या बालाजी मंगल कार्यालयात गर्दी जमवून हम भी कुछ कम नही असे दाखवून दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी आपले कट्टर समर्थक धनाजी बुवासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी तालुक्यातील कार्यकत्यांचा मेळावा घेवून मंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार श्री नाईक-निंबाळकर यांना आपली ताकद दाखवून दिली. या कार्यक्रमाच्या अगोदर काँग्रेसचे बाजार समिती संचालक काकासाहेब मोरे यांनी जेष्ठ नेते धोंडीबापू मोरेंच्या निवासस्थानी समर्थक कार्यकत्यांची बैठक घेवून आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले. तद्नंतर दोन दिवसांनी संजयमामांचा निमसोड गटात दौरा झाला. यावेळी नियोजन मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार मोरे व सभापती सौ. कल्पना मोरे यांनी आपल्या घरी उमेदवार व प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत संजयमामांना मताधिक्य देण्याचे जाहीर केले.
खटाव-माणमध्ये प्रत्येकाची स्वतंत्र पटपडताळणी
RELATED ARTICLES