कराड : खंडोबाच्या नावानं चांगभलं… यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत खोबरे भंडार्यांची उधळण करत लाखो भाविकांनी पाल नगरी दुमदुमून सोडली. सुमारे सहा ते आठ लाख भाविकांच्या उपस्थितीत मल्हारी म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गौरज मुहूर्तावर संपन्न झाला. गोरगरीब जनतेचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणार्या पाल ता. कराड येथील श्री खंडोबा यात्रेनिमित्त भाविकांनी तारळीच्या वाळवंटात एकच गर्दी केली.
ऐतिहासिक पाल ता.कराड येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा शुक्रवारी 18 रोजी मुख्य दिवस होता. जिल्हा प्रशासनाने यात्रेत वेळोवेळी केलेल्या बदलांंमुळे यात्रा सुखकर पार पडली. मिरवणूक मार्गावर पडणारा ताण कमी झाल्यानेही भाविकांना त्रास जाणवला नाही. यावर अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली पंरतु सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचा हा प्रयोग यशस्वी झाला असून उसळणार्या गर्दीचा भाविकांना त्रास झाला नाही. तारळी नदीपात्रातील दक्षिण बाजू भंडारा खोबर्याच्या उधळण्यासाठी भाविकांनी खचाखच भरले होते. पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबर्याच्या उधळणीने पिवळा धमक झाला. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी केलेल्या योग्य नियोजना मुळे यावर्षीच्या सुमारे सात ते आठ लाख भाविकांच्या अथांग जनसागरात कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरळीत पार पडलेल्या सर्वानीच सुटकेचा निःश्वास टाकला
खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काट्या, पालखी सह देवस्थानच्या आकर्षक रथातून मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी 2. 45 वा.च्या सुमारास खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले.मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी 4 वा. च्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवाचे मुखवटे पोटात बांधून अंधार दरवाजा जवळ आले. याठिकाणी ते रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणूकीस सुरूवात झाली.
मानकर्याच्या फुलांनी सजवलेल्या अबदागीरी, चोपदाराचा घोडा, सासन काठ्या, पालखी, मानाचे गाडे या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेवून निघालेले मानकरी अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबर्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट घे… येळकोट येळकोट जय मल्हारचा,असा जयघोष करीत देवाचे दर्शन घेतले. नेहमी मुख्य मिरवणूक सुरु होताच या मार्गावर भाविकांची गर्दी होते पण मागील वर्षषापासून
देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व प्रशासन यांनी यात्रेपुर्व केलेल्या योग्य नियोजना मुळे तसेच समांतर पुल उभारल्याने तारळी नदी वरील मुख्य पूलावरील गर्दी नियंत्रण राहण्यासाठी मदत झाल्याचे दिसून येत आले.
सायंकाळी वाळवंटीतून देवाची शाही मिरवणूक मारुती मंदिर मार्गे बोहल्या जवळ आली यावेळी खंडेरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले व देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपारीक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. तर देवाच्या या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्याचे भाग्य मराठी, कन्नड आंध्र भाषिकांच्या चेहर्यावर जाणवत होते.
मिरवणूकीच्या वेळी झालेली अलोट गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी चोख बंदोबस्तासाठी बँरिगेटस् उभारले होते. काशिळ मार्गे येणारे भाविक प्रथम थेट वाळवंटात घावल्यात आले. हरपळवाडी व मंदिरातून येणार्या भाविकांना उत्तर बाजूचे साकव पुलावरून वाळवंटात सोडण्यात आल्याने बहुतांश भाविकांची गर्दी वाळवंटात थोपावण्यात आली.
यात्रा यशस्वी पार पाडल्यासाठी पाल यात्रा देवस्थान ट्रस्ट, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप भोसले व जिल्हा प्रशासन व उंब्रज पोलिसांनी परिश्रम घेतले.
खंडेरायाच्या लग्नाने पालनगरी दुमदुमली
RELATED ARTICLES