शेतकरी सक्षम करण्यासाठी केंद्राचे महत्वाचे पाऊल : नितीन बानुगडे-पाटील
सातारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असून योजनेच्या नोंदणीत सातारा जिल्हा राज्यात दुसरा आहे. या योजनेच्या माध्यमातून 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणार्या शेतकर्यांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये थेट जमा होणार आहेत. यामुळे शेतकर्यांच्या शेती विषयक गरजा पूर्ण होणार असून त्यांना सक्षम करण्याकडे केंद्र शासनाने हे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जिल्हास्तरीय शुभारंभ श्री. बानुगडे-पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राष्ट्रीय पातळीवर शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे करण्यात आल त्यांचे प्रेक्षपण यावेळी दाखविण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदी यावेळी उपस्थित होते.
शेतकर्यांपुढील अडचणी कधीही संपत नाही, येणार्या प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे, असे सांगून श्री. बानुगडे-पाटील पुढे म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 78 हजार 570 शेतकर्यांची यादी तयार करण्यात आली आहे, हे काय सोपे काम नाही याबद्दल महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, अभिनंदन करतो. या योजनेंतर्गत शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात तीन टप्पयात 6 हजार रुपये जमा होणार आहेत. पहिला हप्ता हा 2 हजार रुपयांचा असणार आहे. केंद्र व राज्य शासन अधिक जागृत होऊन शेतकर्यांसाठी काम करत आहे. यापुढेही विविध योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी यापुढेही प्रयत्न राहणार असल्याचेही श्री. बानुगडे- पाटील यांनी शवेटी सांगितले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकर्यांसाठी खूप महत्वाची आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 75 हजार शेतकर्यांची नोंदणी करण्यात आली असून शेतकर्यांची सर्वाधिक नोंदणी करणारा जिल्हा हा आपला महाराष्ट्रातील दोन नंबरचा जिल्हा आहे. सर्वांच्या मेहनतीमुळे आपला जिल्हा हा राज्यात दुसर्या क्रमांकावर आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. या योजनेचा ज्या शेतकर्यांना लाभ झाला आहे, अशा शेतकर्यांनी या योजनेची माहिती द्यावी. एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या योजनेची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी केले.
शेतकर्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. अल्प व अत्यल्प, भूधारक शेतकर्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष रुपये 6 हजार रुपये अर्थसहाय्य तीन टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मधुकर गार्डे, करंजे, सातारा, सौ. कार्तिकी क्षीरसागर, धामणेर ता. कोरेगाव, महिंद्र जाधव, नवलेवाडी ता. खटाव, महादेव माने, राजमाची ता. कराड, कृष्णत मोरे, केळोली ता. पाटण, बाळासो ठोंबरे, सोनगीरवाडी ता. वाई, सर्जेराव मोरे, बामणोली ता. जावली, भिकन डोईफोडे, धनगरवाडी ता. महाबळेश्वर, शामराव जगताप, वडवाडी ता. खंडाळा, छगन जाधव, पिंपरद ता. फलटण व बाळू लिंगे, म्हसवड ता. माण या पात्र शेतकर्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महसूल, कृषी विभागातील अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या नोंदणीत सातारा राज्यात दुसरा
RELATED ARTICLES