भुईंज : ही माझी आई, हे वडील, भाऊ, सौ. आणि मुले अशी ओळख एकमेकांना करून देण्याची गडबड, हास्यविनोद, आलेल्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू आणि या वातावरणाला कर्णमधूर संगीत आणि सुराचा साज. वरील सर्व गोष्टी एखाद्या लग्न समारंभातील वाटत असल्या तरी ही दृश्य होती, किसन वीर कारखान्यावरील कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कौंटुबिक स्नेहमेळाव्याची.
1 मे जागतिक कामगार दिन याचे औचित्य साधून किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी कामगार आणि त्यांच्या कुंटुबियासाठी स्नेहमेळावा आयोजित करून कामगार दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच कामगारंाच्या कुंटुबातील सदस्याचा एकमेकांशी संवाद व परिचय वाढावा या प्रमुख उद्देशाने मदनदादा भोसले आणि त्यांच्या व्यवस्थापनाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यात सुनील जाधव आयोजित सुर म्युझीकल नाईट या बहारदार मराठी – हिंदी गाण्याचा आयोजित कार्यक्रमाने स्नेहमेळाव्याला एका वेगळ्या उंचीवर नेहुन ठेवले. जय जय महाराष्ट्र माझा, माझी मैना गावाकड राहीली, झिंगाट अशा एकापेक्षा एक गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. किसन वीरचे कर्मचारी अक्षय बाबर यांनी गायलेले बहारों फुल बरसाओं, मेरा मेहबुब आया है, आणि अशोक मिसाळ यांनी बाबुल की दुआएँ लेती जा या गाण्यास उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. यावेळी भुईंज येथील प्रसाद अनिल गुरव (वय 12) याने तबला वादन करून सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.
मदनदादा भोसले यांनी आपल्या मनोगतात किसन वीर कारखाना हे मी माझ कुटुंब मानतो. आपआपसातील संवाद वाढण्यासाठी आणि विचारांची देवाण घेवाण होण्यासाठी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास मिळालेला प्रतिसाद पाहता यापुढील काळात प्रत्येक कामगार दिनादिवशी असा स्नेहमेळावा आयोजित करणार असल्याचे सांगितले. कामगार घेत असलेल्या अथक परिश्रमामुळे आणि त्यांच्या समंजसपणामुळे यापुढील काळात आपण या परिस्थितीतुन निश्चित बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी उपस्थितांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कारखान्याचेे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आपल्या मनोगतात मदनदादांनी शेतकरी हिताबरोबर कामगारांचे हित नेहमीच पाहीले. या कार्यक्रमास कामगार एकत्रित आले ही आनंददायी बाब असल्याचे सांगितले.
डॉ. सौ. निलिमा भोसले यांनी आपले विचार व्यक्त करताना आजचा दिवस खुप आगळावेगळा आहे, कामगार वर्गासाठी कारखान्याने आयोजित केलेले कार्यक्रम पाहुन मनाला निश्चित आनंद वाटला. यावेेळी त्यांनी कामगारवर्गासह उपस्थित महिलांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौ. शारदा अशोक जाधव आणि सौ. सुरेखा अजित खताळ यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सभासद व कामगारांच्या वारसांना व जखमी कर्मचार्यास समुह अपघात विमा योजनेंतर्गंत व कामागारांच्यावतीने दिलेल्या मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. कारखान्याचे एच.आर.मॅनेजर ए.टी. शिंगटे यांनी कारखाना कामगारांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कदम यांनी केले. सुत्रसंचालन सौ. शिला जाधव – शिंदे व जयवंत पिसाळ तर आभार नारायण चुनाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कामगारंानी परिश्रम घेतले.